मुंबई : येत्या 1 ऑक्टोबरपासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु होईल, अशी माहिती राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक पार पडली. या बैठकीत हा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.


छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु असून 22 ऑगस्ट 2017 पर्यंत 22 लाख 40 हजार 943 शेतकऱ्यांची नोंदणी झाली आहे. तर 18 लाख 85 हजार 457 शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज प्राप्त झाले आहेत.

ऑनलाईन अर्ज भरण्यासाठीची मुदत दिनांक 15 सप्टेंबर 2017 पर्यंत राहील आणि 1 ऑक्टोबर 2017 पासून प्रत्यक्ष कर्जमाफीची प्रक्रिया सुरु करण्यात येईल, असा निर्णय आज मंत्रिमंडळ उपसमितीच्या  झालेल्या पहिल्या बैठकीत घेण्यात आला आहे.

बैठकीला कोण कोण उपस्थित होते?

मंत्रालयात कर्जमाफीच्या अंमलबजावणीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची पहिली बैठक पार पडली. यावेळी या समितीचे अध्यक्ष सहकार मंत्री सुभाष देशमुख, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, परिवहन मंत्री दिवाकर रावते, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव डी. के. जैन, सहकार विभागाचे सचिव एस.एस.संधू, कृषी विभागाचे प्रधान सचिव बिजय कुमार इत्यादी मान्यवर या बैठकीला उपस्थित होते.

ई-सुविधा केंद्रांवरील अर्ज भरण्याची प्रक्रिया पूर्णपणे मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरीही काही केंद्रांवर  शेतकऱ्यांकडून अर्ज भरण्यासाठी पैसे आकारण्याच्या तक्रारी येत आहेत. अशा ई-सेवा केंद्रांवर कारवाई करावी आणि बंद असलेली केंद्र तात्काळ सुरु करावेत, असा आदेश या बैठकीत देण्यात आला.