लातूर: शरद पवार हे आरक्षणाच्या मुद्द्यावर आता तेल ओतण्यासाठी उतरले आहेत.आता ते आगीत तेल ओतत आहेत. नामांतर होऊन अनेक वर्षे झाली. आता तो मुद्दा कशासाठी काढला ? फुले, शाहू, आंबेडकरवादी यांना उचकवण्यासाठी तो मुद्दा काढला आहे का ? असा सवाल प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शरद पवार यांना केला आहे. आरक्षण बचाव रॅली सोमवारी लातूर जिल्ह्यात दाखल झाली. उजनी लामजना निलंगा निटूर त्यानंतर लातूर शहरात रॅली दाखल झाली आहे. निलंगा येथील सभेनंतर प्रकाश आंबेडकर यांनी शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर थेट आरोप केला आहे. 


शरद पवार हे जातीय तेढ निर्माण करत आहेत. नामांतराचा मुद्दा हा बऱ्याच वर्षांपूर्वीचा होता. आता त्या मुद्द्याला ते ठरवून हवा देत आहेत. राज्यातील पुरोगामी विचारांच्या लोकांना उचकवण्याचं काम ते करत असल्याचा थेट आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला.


गरीब मराठ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी 288 जागा लढवाव्यात: प्रकाश आंबेडकर


सगेसोयऱ्याचा आणि मराठा आरक्षणाचा विषय मनोज जरांगे पाटील यांनी लावून धरला आहे. त्यांची मागणी मान्य झाली नाही तर ते 288 जागेवर निवडणूक लढवतील असे त्यांनी सांगितले होते. यावर मत व्यक्त करताना प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केले आहे की, मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभेच्या 288 जागा लढणे मराठ्यांचा प्रश्न वेशीवर टांगण्यासाठी लढवणं आवश्यक आहे.


सर्वसामान्य मराठा समाजाला न्याय देण्यासाठी, त्यांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी, मनोज जरांगे यांनी 288 जागा या लढवल्या पाहिजेत. गरीब मराठ्यांचे प्रश्न त्यांच्या अडचणी या निवडणुकीच्या माध्यमातून वेशीवर टांगल्या जातील. राज्यातील श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याला संपूर्णपणे दाबून टाकत आहे. ही परिस्थिती बदलण्यासाठी निवडणुकीला मनोज जरांगे यांनी सामोरे जावे . श्रीमंत मराठा हा गरीब मराठ्याशी सोयरीक करायला तयार नाही. याच मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, बीड या भागातील श्रीमंत मराठे स्वतःला उत्तर प्रदेशमधील लोकासारखं सिंग म्हणून घेण्याची सुरुवात करत होते. मात्र, मोठ्याप्रमाणात टिंगलटवाळी झाल्यानंतर तो विषय मागे पडला, असे प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले.


 बोगस अधिकाऱ्यांची चिडफाड सरकारने केली नाही तर आम्ही करू; बच्चू कडूंचा इशारा


दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरणाऱ्या बोगस अधिकाऱ्यांची माहिती आम्ही गोळा करत आहोत. दिव्यांगासारख्या वेदनादायी घटकाचे आरक्षण हिसकावून घेणाऱ्या अधिकाऱ्यांची चिरफाड आम्हीच करणार. यांच्यावर कारवाई करण्यासाठी सरकार कमी पडलं तर आम्ही ते काम करू, असा इशारा आमदार बच्चू कडू यांनी दिला. ते सोमवारी लातूर जिल्ह्यातील देवणी येथील शेतकरी आणि कार्यकर्त्या मेळाव्यात बोलत होते.


दिव्यांग प्रमाणपत्र वापरून अनेक अधिकारी यांनी सरकारी नोकरीमध्ये उच्चपदस्थ अधिकारी म्हणून काम सुरू केला आहे. दिव्यांगासारख्या वेदनादायी घटकाचा आरक्षण हिसकावून घेणाऱ्यांवर कडक कारवाई सरकारन करणं अपेक्षित आहे. सरकार यात कमी पडलं तर ती कारवाई आम्ही करू, असा स्पष्ट निर्वाळा आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे. असल्या लोकांवर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणं अपेक्षित आहे, असे बच्चू कडू म्हणाले.


पूजा खेडकर प्रकरणानंतर राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केलेले कारनामे उघड होत आहेत. बुलढाण्याचे उपजिल्हाधिकारी रुपेश पागोरे यांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र वापरून नोकरी मिळवली आहे. असेच प्रकार राज्यातील अनेक अधिकाऱ्यांनी केल्याचं आता उघड होत आहे. त्या अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशी ही सार्वत्रिक भावना असल्याचेही बच्चू कडू यांनी म्हटले.


आणखी वाचा


शरद पवार निवडणुकीच्या तोंडावर दंगल घडवण्याची भाषा करतायत, फडणवीसांची उंची कमी करण्याचा प्रयत्न: बावनकुळे