Latur News : लातूरच्या संत तुकाराम विद्यालय प्रशासनाने 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर नेमण्यात आलेल्या चौकशी समितीच्या अहवालानंतर हा निणर्य घेण्यात आला होता. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यापर्यंत विषय गेल्यावर देखील शाळा आपल्या निर्णयावर कायम आहे. तर या सर्व प्रकरणावर पहिल्यांदाच शाळा प्रशासनाने आपली अधिकृत प्रतिकिया दिली आहे. दोन हजार विद्यार्थ्यांचे भवितव्य 14 विद्यार्थ्यांसाठी पणाला लावणार नाही म्हणत विद्यालय प्रशासन माघार घेण्यास तयार नसल्याचे म्हटले आहे. शाळेतील वातावरण दहशतमुक्त करण्यासाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचे शाळा प्रशासनाने म्हटले आहे. 


शाळेची भूमिका काय? 


लातूरच्या संत तुकाराम विद्यालयात दोन गटात झालेल्या हाणामारीच्या घटनेची गंभीर दखल शाळा प्रशासनाने घेतली आहे. चौकशी समितीने दोन दिवसांत चौकशी करत याचा अहवाल दिला. त्यानंतर 14 मुलांना शाळेतून काढण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान यावर आतापर्यंत शाळेकडून कोणतेही प्रतिकिया देण्यात आली नव्हती. मात्र आता यावर शाळेकडून आता प्रतिकिया आली आहे. "घटना घडल्यानंतर चारच दिवसांमध्ये पालकांना टीसी घेऊन जाण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. मात्र ते टीसी घेऊन जात नाहीत यात आमचा दोष नाही. शाळेतील इतर मुलांना दहशतमुक्त करण्यासाठी ही कारवाई योग्यच असल्याचे मत शाळा प्रशासनाचा आहे. 


पालकांची भूमिका...


दरम्यान यावर पालकांनी प्रतिकिया देताना म्हटले आहे की, "आमच्या मुलांना शाळेने टीसी घेऊन जा म्हणत शाळेच्या बाहेर केले आहे. मात्र अद्याप त्यांनी टीसी दिला नाही. मुलांना नेमकं का काढलं याचं सीसीटीव्ही फुटेज ते दाखवत नाहीत, असा आरोप पालकांनी केला आहे. शाळा सुरु झालेली आहे. नवीन शाळेमध्ये आता प्रवेश घेणं शक्य नाही. त्यामुळे यातून योग्य तो मार्ग निघावा अशी पालकांची इच्छा आहे. 


शाळेने पालकांना पाठवलेल्या पत्रात नेमकं काय म्हटलंय?


प्रिय पालक,


तुम्हाला कळविण्यात येते की संत तुकाराम नॅशनल मॉडेल स्कूल, लातूर हे शिस्त आणि मूल्यांसाठी ओळखले जाते. परंतु दुर्दैवाने 25 एप्रिल 2023 रोजी शाळेत एक भयानक घटना घडली. सकाळी 7:46 वाजता विद्यार्थ्यांचे दोन गट शाळेत एकमेकांशी भांडले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये सर्व विद्यार्थी एकमेकांना मारहाण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे. यात काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून एका विद्यार्थ्याचे रक्त सांडले आहे.


या कृत्यात सहभागी असलेल्या विद्यार्थ्यांची आणि मारामारीच्या वेळी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांची शिस्तपालन समितीने चौकशी केली होती. त्यांच्या वक्तव्यावरुन आणि सीसीटीव्ही फुटेजवरुन शिस्तपालन समितीला आपला पाल्य या घटनेत सक्रिय सहभाग असल्याचे दिसून आले आहे.


चौकशीअंती शिस्तपालन समितीच्या सदस्यांनी ही उत्स्फूर्तता पणे नसून पूर्वनियोजित होती. या लढ्याचे नियोजन आणि अंमलबजावणी करण्यात आपला पाल्य आर्यतेज चालुक्य यांचा सक्रिय सहभाग होता. त्याने एक गट केला आणि इतर विद्यार्थ्यांना घाबरवण्यास सुरुवात केली. मारामारीत त्याने विद्यार्थ्यांना मारहाण केली होती. तो गुन्हेगारी कृत्यांमध्ये गुंतलेला दिसला ज्याला प्रवृत्त केले जाऊ शकत नाही. हे इतर विद्यार्थ्यांकडून क्रॉस-वेरिफाईड केले गेले.


हाणामारी इतकी तीव्र होती की अनेक विद्यार्थी गंभीर जखमी झाले. हे पाहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आणि शाळेचे शांत, विद्यार्थी अनुकूल वातावरण बिघडले आहे. अशा कृत्यांमुळे इतरांचा जीव धोक्यात येऊ शकतो. अशाप्रकारच्या कृत्यामुळे इतर विद्यार्थ्यांना असामाजिक कृत्ये करण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. यामुळे शाळेतील एकोपा, प्रतिष्ठा आणि एकूणच शैक्षणिक वातावरण बिघडते.


त्यामुळे तुमच्या मुलाला शाळेतून काढून टाकण्यात येत आहे...


इतर महत्वाच्या बातम्या: 


Latur : दोन गटात हाणामारी, 14 विद्यार्थ्यांना शाळेतून काढले; उपमुख्यमंत्री, शिक्षणमंत्र्यांची मध्यस्थी व्यर्थ


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI