Chandrakant Patil : विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा आणि विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिल्याने महाविकास आघाडी सरकार कोसळले आहे. 


विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अवघे 30 तास दिल्यानंतर शिवसेनेकडून सर्वोच्च न्यायालयात धाव घेण्यात आली होती. मात्र, घनघोर सुनावणीनंतर ठाकरे सरकारला विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यासाठी आदेश देण्यात आले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी विश्‍वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच आपली तलवार म्यान केली आणि राजीनामा दिला.


दरम्यान, शिंदे गटाच्या समर्थनाच्या जोरावर राज्यात भाजप सरकार येणार यावर शिक्कामोर्तब झाल आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस असतील यात शंका नाही. मात्र आता संभाव्य मंत्रिमंडळ कसं असेल? राज्यातील प्रदेशनिहाय त्याचे मंत्रिमंडळ वाटप कसं असेल? शिवसेना बंडखोर मंत्र्यांना मंत्रिपद पुन्हा मिळणार का? तसेच भाजपमधील नवीन चेहरे कोण असतील याबाबत चर्चा सुरू झाली आहे.


कोल्हापूर जिल्ह्यातून मंत्रिपद कोणाला?


कोल्हापूर जिल्ह्यातही  बंडखोरीचे पडसाद उमटले. जिल्ह्यातील शिवसेनेचे एकमेव आमदार प्रकाश आबिटकर तसेच शिवसेनेला पाठिंबा दिलेले अपक्ष आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर तसेच राज्य नियोजन आयोगाचे अध्यक्ष आणि माजी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा देत गुवाहाटीमध्ये दाखल झाले. यामुळे मंत्रिपदासाठी राजेंद्र पाटील यड्रावकर आणि  प्रकाश आबिटकर रेसमध्ये असतील. त्याचबरोबर भाजपला पाठिंबा दिलेले आमदार प्रकाश आवाडे त्याचबरोबर जनसुराज्य शक्ती पक्षाचे विनय कोरे यांनाही संधी मिळते का? याचीही उत्सुकता आहे. 


चंद्रकांत पाटील कोल्हापूरला पसंती देणार की पुणेकर होणार?


मंत्रिपदाबरोबर कोल्हापूरचे पालकमंत्री कोण होणार? याचीही चर्चा आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये पालकमंत्रिपद सतेज पाटील यांच्याकडे होते. गेल्या अडीच वर्षापासून त्यांनी जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची धुरा सांभाळली होती. मात्र, आता सरकार कोसळल्याने ही जबाबदारी कोणाकडे जाणार याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, चंद्रकांत पाटील हेच प्रबळ दावेदार मानले जात असले, तरी सध्या सद्यस्थितीमध्ये ते पुण्यामधील कोथरूड मतदारसंघाचे आमदार आहेत.


त्यामुळे मतदारसंघावर लक्ष ठेवण्यासाठी ते पुण्याचे पालकमंत्री स्वीकारतात की कोल्हापूरला प्राधान्य देतात? याची उत्सुकता आहे. जिल्ह्यामध्ये भाजपचे अस्तित्व निर्माण करण्याचे आव्हान भाजपसमोर आहे. धनंजय महाडिक खासदार झाल्याने महाडिक गट आणि भाजपमध्ये उत्साह संचारला आहे. चंद्रकांत पाटील पालकमंत्रिपद स्वीकारताना ते कोल्हापूरला प्राधान्य देतात की पुण्याचा विचार करतील याबाबतही उत्सुकता आहे. 


कोल्हापूर जिल्ह्यात एकही भाजप आमदार नाही. आगामी काळात जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका तसेच मनपा निवडणूक सुद्धा होत आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढवण्यासाठी पालकमंत्रिपदासाठी कोल्हापूर निवडतात की पुणेकर होतात याची चर्चा रंगली आहे.