Radhakrishna Vikhe Patil : महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. कोल्हापूर विमानतळावर पोहोचल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर हल्ला चढवला. काँग्रेसचे अस्तित्व कुठं राहिलं आहे? असा सवाल करत कधीकाळी काँग्रेसी असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनी (Radhakrishna Vikhe Patil on congress) थेट वार केला. राज्य अधोगतीला जात होतं, आम्ही जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू, असेही यावेळी राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले. 


राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की, काँग्रेस पक्षासाठी ना नेते मंडळींना स्वारस्य राहिलं आहे, ना पक्ष नेतृत्वाला राहिलं आहे. यावेळी त्यांनी वाळू माफियांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, वाळू माफियांचा उन्माद ही संपूर्ण महाराष्ट्राला लागलेली कीड आहे, यातून गुन्हेगारी वाढलेली आहे. हे थांबवण्यासाठी काही धोरण आणावे लागेल. अवैध वाळू उपसामधून निर्माण झालेल्या अनैतिक गोष्टी थांबवण्यासाठी प्राधान्य दिले जाणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली.   


शिर्डी लोकसभा मतदारसंघात पक्ष जो निर्णय घेईल त्या पद्धतीने काम 


दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दोन दिवसांपूर्वीच बोलताना शिर्डी लोकसभा मतदारसंघातून मी 2024 मध्ये लढण्यात इच्छुक असल्याचे सांगितले आहे. यावेळी आपण पराभूत होणार नाही. 2009 मध्ये नगरची जागा राष्ट्रवादीने बाळासाहेब विखेंना दिली नाही. त्यामुळे त्यांनी त्यावेळी शिर्डीत फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे मला पराभव पत्करावा लागला. नंतर राज्यसभेचे सदस्य व्हावे लागले. परंतु आता मी 2024 च्या निवडणुकीत शिर्डीमधूनच उभा राहणार असून येथून चांगल्या मतांनी निवडून येईल, असा मला विश्वास वाटतो, असेही आठवले म्हणाले होते.


या पार्श्वभूमीवर त्यांना विचारण्यात आले असता त्यांनी सांगितले की, शिर्डी लोकसभा मतदारसंघ हा राखीव आहे. त्यामुळे पक्ष जो निर्णय घेतील त्या पद्धतीने काम करायचे असल्याचे त्यांनी नमूद केले. 


इतर महत्त्वाच्या बातम्या