चंदगड (कोल्हापूर) : उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि गडहिंग्लज दौऱ्यावर होते. या दौऱ्यानंतर चंदगड ग्रामस्थांचा रोष उफाळून आला. काल (9 फेब्रुवारी) उद्घाटन करण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाकून ठेवल्याने ग्रामस्थांचा संताप अनावर झाला. त्यामुळे अजित पवार चंदगडमधून बाहेर पडल्यानंतर भाजप नेते शिवाजी पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी पुतळा केला खुला केला. या पुतळ्याचे संभाजी भिडे आणि शिवाजी पाटील यांच्या उपस्थितीत पुतळ्याचे अनावरण करण्यात आले होते.


अजून परवानग्या बाकी असल्याचे कारण देत प्रशासनाकडून अजित पवारांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर  झाकून ठेवण्यात आला होता. यावेळी आमदार राजेश पाटील यांच्या विरोधातही ग्रामस्थांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, अजित पवार यांनी चंदगड आणि गडहिंग्लज दौरा पूर्ण केल्यानंतर विविध विषयांवर भाष्य केले. ते म्हणाले की, बाबा सिद्धीकी यांचा पक्षप्रवेश यापूर्वीच ठरला आहे. कोणत्याही घाईगडबडीत ठरलेला नाही. काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी एक हरहुन्नरी कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात येणं कबूल केलं आहे. 


त्या भेटीला काहीही अर्थ नसतो 


राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाल्याने महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून आज राज्यपालांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. ते म्हणाले की, आम्ही जेव्हा महाविकास आघाडीत होतो. त्यावेळी आम्ही देखील अनेकवेळा राज्यपालांची भेट घेतली आहे. त्या भेटीला काहीही अर्थ नसतो हे सगळ्यांना माहिती असतं. त्यानिमित्ताने मीडियामध्ये दाखवलं जातं, अशी टीका त्यांनी केली. राष्ट्रपती राजवट आणायचं काय कारण आहे? या महायुती आघाडीच्या सरकारला दोनशे आमदारांचा पाठिंबा आहे. 145 आमदार असले, तरी सरकार राहतं. आता तर 200 च्या वर आमदारांचा पाठिंबा आहे त्या सरकारला अडचण काय आहे? अशी विचारणा त्यांनी केली. 


यात पोलिसांचा काय दोष आहे का?


घोसाळकर यांच्या निर्घृण हत्येवरही त्यांनी भाष्य केले. त्या दोघांनी फेसबुक लाईव्ह केलं आणि गोळ्या घातल्या यात पोलिसांचा काय दोष आहे का? मी या गोष्टीचा समर्थन अजिबात करत नाही. परंतु सत्ताधारी पक्षाच्या एका आमदाराने पोलीस स्टेशनमध्ये गोळ्या झाल्या. ताबडतोब पोलीस आतमध्ये आले. गोळी झाडणार्‍यांच्या हातात बंदूक होती. ज्याच्यावर गोळ्या झाडल्या त्याच्या हातातही बंदूक होती. फक्त त्याला काढता आली नाही. त्यानं काढली असती तर काय घडलं असतं? दोघांकडेही बंदूक होती. माझ्या माहितीप्रमाणे दोघेही आडनाव बंधू होते. खोलात जाऊन नक्की जमिनीच्या वादातून झालंय की आणखी कशातून हा प्रकरण घडलं आहे याचा तपास सुरू आहे. 


राज्यात कायदा सुव्यवस्था चांगली राहिली पाहिजे यात दुमत असण्याचा अजिबात कारण नाही. कालच्या गोळीबारात गुंडांनी गुंडांनाच मारलेला आहे यात आपला कोणाचाही दोष नव्हता. मात्र, या प्रकरणात निष्पप व्यक्तीला मारलं आहे असं काही घडलं आहे का? कायद्यापेक्षा कोणी श्रेष्ठ नाही असे ते म्हणाले. काल पुण्यात निखिल वागळेंवर देखील हल्ला झाला. मी सर्व पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बोललो. त्या हल्ल्यात राष्ट्रवादीचा एकही कार्यकर्ता नव्हता. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची नावे घेतली. ज्यांनी आरोप केले त्यांनी ते खरे करावेत, जे काही खरं असेल त्याच्यावर पोलीस खातं ॲक्शन घेईल, असेही त्यांनी सांगितले. 


इतर महत्वाच्या बातम्या