Kolhapur Crime : दहशत माजवणाऱ्यांविरोधात कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) धडक कारवाई सुरुच ठेवली आहे. कोल्हापूर शहरात नव्या वर्षात पोलिसांनी दुसऱ्यांदा कारवाई करताना वारे वसाहतीमधील व्ही. सी. बॉईज टोळीतील 12 जणांवर एक वर्षासाठी हद्दपारीची कारवाई करण्यात आली. पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी याबाबतचे आदेश दिले. नव्या वर्षात कोल्हापूर आणि इचलकरंजी शहरातून तब्बल 18 जणांना हद्दपार करण्याची कारवाई करण्या आली आहे. 


जिल्ह्यातून (Kolhapur Crime) या टोळीला एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. संजय अशोक आवळे, स्वप्नील ऊर्फ सागर संजय चौगुले, सरदार अशोक आवळे, गजानन अनिल गणेशाचार्य, विश्वजित विजय चौगुले, निवास अशोक आवळे, विलास अशोक आवळे, अमित संजय घाडगे, अक्षय महादेव लोखंडे (सर्व रा. वारे वसाहत, मंगळवार पेठ), अवधूत किरण खटावकर (रा. हनुमाननगर, पाचगाव रोड), धीरज राजेश शर्मा (जोतिर्लिंग कॉलनी, पाचगाव), स्वप्नील सुनील गाडेकर (रा. सुभाषनगर) अशी त्यांची नावे आहेत.


दरम्यान, कोल्हापूर शहरातील संवेदनशील असलेल्या वारे वसाहतमध्ये गेल्या काही दिवसांपासून सतत मारामारी, धमकावणे, दशहत पसरविणे या प्रकारचे गुन्हे घडत होते. येथील व्ही. सी. बॉईज या टोळीतील गुंड आघाडीवर होते. या टोळीतील दोनपेक्षा अधिक गुन्हे दाखल असणाऱ्या गुंडांचा प्रस्ताव जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे निरीक्षक दत्तात्रय नाळे यांनी बनवला होता.


शहर पोलीस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी तीन महिन्यांपूर्वी हा प्रस्ताव सक्षम करून मंजुरीसाठी पोलीस अधीक्षक शैलेश बलवकडे यांच्याकडे पाठवला होता. यावर पोलिस अधीक्षक बलकवडे यांनी सुनावणी घेतली. यानंतर महाराष्ट्र पोलिस अधिनियम 1951 चे कलम 55 नुसार या टोळीतील 12 जणांवर हद्दपारीची कारवाई केली.


तीन अट्टल गुन्हेगारांना नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार 


दरम्यान, कोल्हापूर शहरातील (Kolhapur Crime) तीन अट्टल गुन्हेगारांना पहिल्याच दिवशी एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. यादवनगरातील तीन गुन्हेगारांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आलं आहे. अश्विन अनिल शेळके (गणेश मंदिराजवळ, यादव नगर) गौरव अनिल जानकर (यादव नगर) आणि परेश अनिल कस्तुरे (गणेश मंदिराजवळ, यादवनगर) अशी त्यांची नावे आहेत. याबाबतची माहिती राजाराम पोलिसांनी दिली आहे. 


इचलकरंजीमधील तीन गुंडांवर कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपारची कारवाई


दुसरीकडे, कोल्हापूर शहरात तीन अट्टल गुन्हेगारांवर वर्षाच्या सुरुवातीच्या पहिल्याच दिवशी हद्दपारीची कारवाई झाल्यानंतर इचलकरंजीमधील (Ichalkaranji Crime) रेकॉर्डवरील दोघांना एक वर्ष तर एकास 6 महिने कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. नागेश ऊर्फ नांग्या ऊर्फ नागराज शिवाप्पा हिरेकुरबुर ऊर्फ पुजारी (रा. पाटील मळा), अश्पाक ऊर्फ आसिफ अल्लाउद्दीन राजनन्नावर (रा. आसरानगर), तोहीद अर्षद सावनूरकर (रा. विक्रमनगर) अशी त्यांचे नावे आहेत.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार (Kolhapur Crime) तोहीदच्या विरोधात दंगा, दरोडा, फसवणूक, खंडणीचा, आसिफवर खुनाचा प्रयत्न, मारामारीचा गुन्हा दाखल आहे. नागेशवर खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, जबरी चोरी, मारामारीचा गुन्हा दाखल आहे. या तिघांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याचा प्रस्ताव पोलिस निरीक्षक राजू ताशिलदार यांनी वरिष्ठांकडे पाठवला होता. 


इतर महत्वाच्या बातम्या