Kolhapur NCP : कोल्हापूर राष्ट्रवादीमध्ये (Kolhapur NCP controversy) वादाची आणि नाराजीची मालिका सुरुच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील (A. Y. Patil) यांच्या नाराजीवर पडत नसतानाच आणखी दोन नेत्यांमध्ये बुधवारी जोरदार वाद झाला. दोन्ही नेत्यांनी एकमेकाना एकेरी भाषेचा वापर केल्याने माजी नगरसेवक आदिल फरास यांनी वाद थांबवला. सीमाभागातील कर्नाटक सरकारच्या दंडेलशाहीच्या विरोधात  (Maharashtra-Karnataka border dispute) काल कोल्हापूर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक आयोजित  करण्यात आली होती. या बैठकीनंतर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे यांच्यात वाद झाला. शाब्दिक बाचाबाचीनंतर एकेरी उल्लेख करण्यापर्यंत हा वाद वाढत गेला. सर्किट हाऊस परिसरात हा वाद झाला.  


महाविकास आघाडीची बैठक (MVA) पार पडल्यानंतर आर. के. पोवार, आदिल फरास, जयकुमार शिंदे, महेंद्र चव्हाण हे पदाधिकारी बाहेर पडले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष अनिल साळोखे त्या ठिकाणी उभे होते. पार पडलेल्या बैठकीला निमंत्रण देण्यावरून आर. के. पोवार आणि अनिल साळोखे यांच्यात वादाची ठिणगी पडली. यानंतर दोन्ही नेत्यांकडून एकमेकांच एकेरी उल्लेख करण्यापर्यंत वाद जाऊन पोहोचला. त्यामुळे आदिल फरास यांनी मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना बाजूला करून वादावर पडदा टाकला. 


ए. वाय. पाटील यांचीही नाराजी


राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील सुद्धा गेल्या काही दिवसांपासून नाराज आहेत. त्यांनी यापूर्वी कार्यकर्त्यांचा मेळावा घेत निर्णय घेण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर ते शिंदे गटाच्या व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत दिसून आल्यानंतर ते शिंदे गटात सामील होणार असल्याची चर्चा रंगली. मात्र, अजित पवार यांनी इस्लामपुरात एबीपी माझाशी बोलताना त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे सांगितले. आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif on NCP) यांनी 3 डिसेंबर रोजी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांच्या शिंदे गटाच्या व्यासपीठावर उपस्थित राहण्यावरून भाष्य केले. ते म्हणाले, जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामींच्या आमंत्रणानुसार पंचगंगा आरतीसाठी गेले होते. मलाही आमंत्रण होते. 


लोकसभेसाठी कोल्हापुरात राष्ट्रवादीकडून तीन-चार इच्छूक


दरम्यान, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघातून भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी सुरु असतानाच आता माजी मंत्री आमदार हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूरमधून राष्ट्रवादीकडून तीन ते चारजण इच्छूक असल्याचा दावा केला आहे. 


मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, राष्ट्रवादीकडून व्ही. बी. पाटील, चेतन नरके इच्छूक आहेत. तसेच इतरही अनेक इच्छूक आहेत.चेतन नरकेंच्या उमेदवारी संदर्भात अरुण नरके यांनी शरद पवार यांची भेट घेणार असल्याचे म्हटले होते. या पार्श्वभूमीवर विचारले असता मुश्रीफ म्हणाले होते की, लोकशाहीत उमेदवारीसाठी कोणालाही भेटण्याचा अधिकार आहे. पवार आणि अरुण नरके यांचे जुने संबंध आहेत. आपण स्वत: विधानसभा लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. 


इतर महत्वाच्या बातम्या