Kolhapur News: मध्यरात्री प्रेयसीने प्रियकराला भेटायला बोलावल्यानंतर सापडल्याने पळून जाताना विहिरीत कोसळून जीव गमावल्याची घटना कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यात घडली होती. शुभंकर संजय कांबळे (वय 17, रा. वाकीघोल, ता. राधानगरी, जि.कोल्हापूर) असे मृत प्रियकराचे नाव आहे. मात्र, या प्रकरणाला आता वेगळे वळण लागलं आहे. मृत शुभंकरच्या वडिलांनी फिर्याद दाखल केल्यानंतर 9 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 


पाचर्डे (ता. भुदरगड) येथे झालेल्या शुभंकर कांबळे या युवकाच्या मृत्यूप्रकरणी नऊ जणांवर भुदरगड पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. शुभंकरचे वडील संजय कांबळे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शुभंकरला मैत्रिणीने भेटण्यासाठी फोन करून बोलावले होते. याच रागावरून शुभंकरच्या छातीवर व इतरत्र लाथाबुक्यांनी मारहाण करून झाडाला बांधून ठार मारल्याची फिर्याद दिली आहे. याप्रकरणी पाचर्डे येथील संजय साताप्पा कांबळे, एकनाथ दिनकर कांबळे, रंगराव लक्ष्मण कांबळे, आकाश ज्ञानदेव कांबळे, अक्षय अंकुश कांबळे, आदर्श रंगराव कांबळे, प्रवीण दत्तात्रय कांबळे व महेश शंकर कांबळे (रा. नाधवडे), अक्षय आनंदा कांबळे (रा. आडोली, ता. राधानगरी) यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.


काय आहे प्रकरण?


शुभंकरला प्रेयसीने घरी आपल्या कोणीच नसल्याचे पाहून प्रियकराला मध्यरात्री बोलवून घेतले. मात्र प्रेयसीच्या घरची मंडळी बाहेर गेलेली परत आल्यानंतर दोघेही एकत्र दिसले. यानंतर प्रेयसीच्या कुटुंबीयांना प्रियकराला दोरीने आंब्याच्या झाडाला बांधून ठेवले. यानंतर हिसडा मारून पळून जात असताना ग्रामस्थ पाठीमागे लागल्याने वाटेत त्याला विहीर न दिसल्याने तो थेट विहीरीत कोसळला. या घटनेत त्याचा बुडून मृत्यू झाल्याची फिर्याद दाखल झाली होती. 


पहिल्यांदा दाखल फिर्यादीनुसार, अल्पवयीन प्रेयसीने प्रियकराला घरी बोलावले. तो तिला भेटायला आला होता. रात्री अडीचच्या सुमारास बाहेर गेलेले तिच्या घरची मंडळी घरी आली. त्यावेळी आनंदा ज्ञानू कांबळे यांच्या घराशेजारी प्रेयसी आणि प्रियकर झाडाखाली उभे होते. यावेळी त्या दोघांना अशोक गोविंद कांबळे यांनी बाजूला केले.  रंगराव कांबळे व संजय कांबळे यांनी प्रियकर शुभंकरच्या उजव्या हाताला दोरी बांधून गोविंद कांबळे यांच्या दारातील आंब्याच्या झाडाला बांधून घातले. शुभंकरने पहाटे पावणे तीनच्या सुमारास हाताला हिसडा मारुन तेथून अंधारातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गावातील लोकांनी त्याला पकडण्यासाठी पाठलाग सुरु केला. मध्यरात्रीच्या अंधारात पळताना रस्ता ओलांडून जात असताना  विहिर न दिसल्याने पाण्यात कोसळला. त्यामुळे त्याचा पाण्यात पडून बुडून मृत्यू झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या