Kolhapur Expansion Plan : कोल्हापूरची नगरपालिका 1972 मध्ये महापालिका झाल्यानंतर तब्बल 50 वर्षांचा कालावधी झाला असला, तरी अजूनही हद्दवाढीचा मुद्दा निकालात निघालेला नाही. आता शासन दरबारी पुन्हा एकदा हद्दवाढीचा प्रस्ताव नव्याने मागवण्यात आल्याने आता, तरी कोंडी फुटणार का? याची चर्चा रंगली आहे. 


नगरविकास विभागाने बुधवारी रात्री हद्दवाढीबाबत मागवलेल्या माहितीने पुन्हा एकदा हद्दवाढीची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, सामूहिक इच्छाशक्ती दाखवून या निर्णयाची अंमलबजावणी आवश्यक आहे. महाविकास आघाडी सरकारमध्ये एकनाथ शिंदे नगरविकास मंत्री असताना त्यांनी कोल्हापूर महापालिकेकडून हद्दवाढीचा फेरप्रस्ताव मागवला होता.


यापूर्वी कोल्हापूर मनपा प्रशानाकडून  गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात 18 गाव तसेच गोकुळ शिरगाव, शिरोली या दोन एमआयडीसींचा प्रस्ताव पाठवला होता. तथापि मनपा निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्याने त्यावर नव्या सभागृहातून पाठपुरावा सुरु होईल, अशी चर्चा रंगली. मात्र, राजकीय उलथापालथीमध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि मनपा निवडणुकांसह स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणूका रद्द केल्या आहेत.  


नगरविकास विभागाने पाठवलेल्या पत्रात 2017 ते आतापर्यंतच्या कालावधीमध्ये महानगरपालिका क्षेत्रात हद्दवाढ झाली असल्यास अथवा यापूर्वी हद्दवाढ झालेल्या शहरांचे पुन्हा ग्रामपंचायतीमध्ये रूपांतर झाले असल्यास त्याबाबतची माहिती तसेच 2017 प्रमाणे एकूण निर्वाचित सदस्यांची संख्या याबाबतची माहिती तत्काळ पाठवावी, असे म्हटले आहे.


कोल्हापूर मनपा माहिती आज पाठवणार


कोल्हापूर महापालिका प्रशासनाने फेब्रुवारी 2021 मध्ये 18 गावे व दोन एमआयडीसींसह पाठवलेला प्रस्ताव, तसेच 1972 नंतर आजतागायत शहराची हद्दवाढ झाली नसल्याची 81 सदस्य संख्येची माहिती पाठवण्याची तयारी केली असून ही माहिती आज पाठवली जाणार आहे. मनपा प्रशासनाने 2013 पासून 2021 पर्यंत 4 वेळा प्रस्ताव पाठवले आहेत. महापालिकेने 17 गावांचा समावेश करून राज्य शासनाकडे 2014 मध्ये प्रस्ताव सादर केला होता; पण सरकारकडून 2017 मध्ये 42 गावांचा समावेश असलेल्या प्राधिकरणाची घोषणा करण्यात आली होती. त्यामुळे शहराची हद्दवाढ पुन्हा थांबली होती. त्यानंतर 2021 मध्ये महापालिकेने नवीन प्रस्ताव सादर केला होता.


प्रस्तावात या गावांचा समावेश


मनपा प्रशासनाने राज्य शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात शिये, वडणगे, आंबेवाडी, सरनोबतवाडी, उजळाईवाडी, नागदेववाडी, नवे बालिगे, पीरवाडी, मोरेवाडी, पाचगाव, कळंबा तर्फ ठाणे, शिरोली, उंचगाव, शिंगणापूर, नागाव, वळीवडे, गांधीनगर, मुडशिंगी या 18 गावांसह गोकुळ शिरगाव व शिरोली या दोन एमआयडीसींचा समावेश आहे.