कोल्हापूर : भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ यांना कोल्हापूरचे पालकमंत्रीपद मिळाले हे त्यांनी विसरू नये, भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावे लागेल. ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील त्या त्या वेळी मी त्यांच्या समोर उभा राहील, असा इशाराच दिला. हसन मुश्रीफ यांन पालकमंत्रिपद मिळाल्यानंतर भाजपची जिल्ह्यातील अवस्था सांगताही येत नाही आणि बोलताही येत नाही, अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर मुश्रीफ यांच्यावर दुसऱ्याच दिवशी थेट हल्लाबोल केल्याने  समरजित घाटगे यांचा पवित्रा कायम असणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 


समरजित घाटगे म्हणाले की,  भाजपच्या मेहरबानीमुळे हसन मुश्रीफ यांना पालकमंत्रीपद मिळाले, हे त्यांनी विसरू नये. भाजपच्या चौकटीत राहूनच त्यांना काम करावं लागेल. ज्या ज्या ठिकाणी चौकट ओलांडतील, त्यावेळी मी त्यांच्यासमोर उभा राहणार आहे. मुश्रीफ मुख्यमंत्री झाले तरी मला फरक पडत नाही, पालकमंत्री तर सोडाच. त्यांच्याशी माझा संघर्ष कायम अटळ आहे. संघर्ष जितना बडा होगा, जीत उतनी शानदार होगी.


कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्नपूर्ती


दरम्यान, मुश्रीफ यांचे कोल्हापूरचे पालकमंत्री म्हणून स्वप्न पूर्ण झालं नव्हतं. 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर अहिल्यादेवी होळकर नगर जिल्ह्याची जबाबदारी त्यांना मिळाली होती, तर कोल्हापूरचं पालकत्व पहिल्यांदा बाळासाहेब थोरात यांच्या वाट्याला आल्यानंतर त्यांनी ते नंतर सतेज पाटील यांच्याकडे दिलं होतं. त्यामुळे हसन मुश्रीफ हे कॅबिनेट मंत्री असूनही कोल्हापूरचे पालकमंत्री होऊ शकले नव्हते. त्यामुळे आता ही कसर आता भरून निघाल्याने त्यांची स्वप्नपूर्ती झाली आहे. 


दीपक केसरकरांविरोधात भाजपची नाराजी


अजित पवार गट सत्तेत सहभागी झाल्यानंतर मातब्बर खाती आपल्या पदरात पाडून घेतली आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार आणि पालकमंत्रीपदाचाही पेच कायम होता. मावळते पालकमंत्री दीपक केसरकरांच्या कार्यशैलीवरून कोल्हापूर जिल्ह्यात प्रचंड नाराजी होती. मेन राजाराम स्थलांर, पुरावरून विधान, शेतकरी संघाची जागा ताब्यात घेण्यावरून त्यांच्यावर कोल्हापुरात टीकेची झोड उठली होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री अजित पवार गटाकडे येण्याचेच संकेत अजित पवार यांच्या ध्वजारोहणातून मिळाले होते.  दुसरीकडे, कोल्हापूर जिल्ह्यात अजित पवार भाजपच्या मांडीला मांडी लावून बसल्याने राजकीय परिस्थिती बदलली आहे. शिंदे गटाचे केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असूनही त्यांच्या विरोधात भाजपने मोर्चा खोलला होता. हे पालकमंत्री नव्हे, तर पर्यटनमंत्री असल्याची टीका भाजपकडून करण्यात आली होती. जिल्ह्यातील विशेष कार्यकारी अधिकाऱ्यांच्या रखडलेल्या नेमणुकीवरून भाजपने त्यांच्यावर थेट हल्लाबोल केला होती. त्यामुळे कोल्हापूरचे पालकमंत्री बदलले जातील, असेच एकंदरीत चित्र होते.