कोल्हापूर : गेल्या दोन वर्षापासून साखरेसह उपपदार्थांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगला दर मिळाला असून यामुळे साखर कारखान्यांकडे एफआरपी रक्कम अदा करून पैसे शिल्लक राहिले आहेत. सदरचे पैशांवर शेतकऱ्यांचा अधिकार असून राज्यातील सर्व पक्षाचे साखर कारखानदार एक होऊन या पैशांवर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत. यामुळे गतवर्षी हंगामात झालेली चूक कारखानदारांनी न करता यावर्षीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन एफ. आर. पी पेक्षा जादा रक्कमेला मंजूरी देण्याबाबत कारखान्यांना लेखी आदेश निर्गमित करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमणार यांचेकडे लेखी पत्रातून केली आहे. 


सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत


गेल्या दोन वर्षापासून केंद्र सरकारच्या धोरणामुळे देशातील साखर कारखान्यांनी ऊसापासून इथेनॅाल निर्मिती करण्यास प्राधान्य दिले. यामुळे साखर , इथेनॅाल , बगॅस, को -जन , स्पिरीट , अल्कोहोल , मळी यासह इतर उपपदार्थांना चांगला दर मिळाला आहे. यामुळे साखर कारखान्यांकडे उत्पादन खर्च वजा जाता पैसे शिल्लक राहू लागले आहेत. गतवर्षी राज्यातील सोमेश्वर, माळेगांव, विघ्नहर्ता, भीमाशंकर या कारखान्यांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत एफआरपीपेक्षा जादा रक्कमेस मंजूरी घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काचे जादा पैसे दिले. मात्र याप्रमाणे राज्यातील इतर कारखान्यांनी मखलाशी करत वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव नसल्याचे कारण दाखवित शासनाकडे बोट दाखवून सर्वपक्षीय कारखानदार एकजूट करून या पैशावर डल्ला मारण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे. 


यामुळे चालू हंगामातील साखर व उपपदार्थाच्या जादा उत्पन्नातील आलेले पैसे शेतकऱ्यांना मिळण्यासाठी आताच साखर आयुक्तांनी सर्व कारखान्यांना वार्षिक सर्वसाधारण सभेत विषय पत्रिकेवर विषय घेऊन या विषयास मंजूरी घेण्याबाबत लेखी आदेश काढून कळविण्याबाबतची मागणी केली. यामुळे राज्यातील सर्व कारखान्यांना लेखी आदेश करून या विषयास साखर कारखान्यांच्या वार्षिक सर्वसाधारण सभामध्ये हा शेतकरी हिताचा निर्णय झाल्यास याचा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या