कोल्हापूर : निवडणूक लढवायला सोपं जावं म्हणून स्वाभिमानी पक्षाची स्थापना केली. त्या पक्षाच्या वतीनेच मी निवडणूक लढवत आलो. आता मी राजकीय फायद्यासाठी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून, संघटनेला वाऱ्यावर सोडून मी ही निवडणूक लढवू शकत नाही आणि त्यामुळे मी मशाल चिन्ह घेणार नाही असं ठाकरे यांना कळवल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी म्हटले आहे. हातकणंगलेतून (Hatkanangle Lok Sabha) ठाकरे गटातून सत्यजित पाटील सरुडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शेट्टी म्हणाले की, हातकणंगलेतून ठाकरेंकडून उमेदवार जाहीर केला आहे. तो त्यांचा निर्णय आहे. परंतु स्वतंत्र लढायची भूमिका मी पहिल्यापासूनच घेतली होती. आता त्या खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचा आवाज, सामान्यांचा आवाज, गोरगरिबांचा आवाज संसदेपर्यंत पोहोचवायचा जबाबदारी आता सर्वसामान्य लोकांनी शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी गावातल्या लोकांनी घेतली पाहिजे. तुम्ही सगळ्यांनी आता ही निवडणूक हातात घ्या आणि आपण लढू आणि आपण जिंकू अशी खात्री असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. 



म्हणून महाविकास आघाडी सोडली 


शेट्टी यांनी सांगितले की, स्वाभिमानी शेतकरी संघटना 2021 मध्येच महाविकास आघाडीतून बाहेर पडली होती आणि त्याचं कारण तीन तुकड्यांमध्ये केलेली एफआरपी आणि भूमी अधिग्रहण कायद्यामध्ये दुरुस्ती करून शेतकऱ्यांवर फिरवलेला वरवंटा या दोन धोरणात्मक बाबीला विरोध म्हणून आम्ही महाविकास आघाडी सोडली होती. त्यानंतर राज्य कार्यकारिणीने स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाशी अधीन राहून गेल्या तीन वर्षापासून लोकसभेच्या स्वतंत्र निवडणूक लढवण्याच्या तयारी आम्ही केली होती. 


परंतु अचानक काय झालं मला माहिती नाही. 


मधल्या काळामध्ये भाजपच्या विरोधातील मतविभागणी टाळण्यासाठी म्हणून महाविकास आघाडीचा पाठिंबा घ्यावा, असा विचार काही लोकांनी मांडला होता. महाविकास आघाडीचे नेते सातत्याने हातकणंगलेमध्ये आम्ही उमेदवार देणार नाही, जागा स्वाभिमानीला सोडणार असे म्हणत होते. त्यामुळे आम्ही आघाडीत येणार नाही परंतु तिथं उमेदवार उभा केला नाहीत, तर निश्चितच भाजपविरोधातील मतविभागणी टाळता येईल अशी भूमिका घेऊन दोनवेळा मी उद्धवजींना भेटलो होतो, असे त्यांनी सांगितले. 


ते पुढे म्हणाले की, बरीच सविस्तर चर्चा झाली होती आणि त्यांना काही अंशी ते पटलेलं सुद्धा होतं. लवकरच आम्ही निर्णय घेऊ असं त्यांनी सांगितलं. परंतु अचानक काय झालं मला माहिती नाही. परंतु त्यांच्याकडून मशाल चिन्हावर लढले पाहिजे, असा निरोप आला. आता मशाल चिन्ह हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला मिळालेलं आहे आणि ते चिन्ह घेणं याचा अर्थ मी शिवसेनेमध्ये प्रवेश करणार असा होता. गेली 30 वर्ष मी शेतकरी चळवळीमध्ये आहे, मी माझ्या आयुष्यामध्ये कुठल्याही राजकीय पक्षांमध्ये काम केलेले नाही. 


इतर महत्वाच्या बातम्या