कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभेसाठी रिंगणात असलेल्या करवीर संस्थानचे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज (Shahu Maharaj) यांना वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आज पूर्ण पाठिंबा जाहीर केला. शाहू महाराज यांनी लोकसभेच्या रिंगणामध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकल्याचे बोलले जात आहे. प्रकाश आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत शाहू महाराजांना पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. 






दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेसला सात जागांवर पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती. याबाबत बोलताना आंबेडकर यांनी काँग्रेसने त्या जागा सांगाव्यात असे म्हटले आहे. सर्वांचं जमलं नाही तर प्रत्येकाला 48 जागा लढवाव्या लागतील. त्यामध्ये काँग्रेस 48 जागा लढत असेल, तर सात जागांवर मी पाठिंबा देऊ असं त्यांनी नमूद केले. आम्हाला चार जागांचा प्रस्ताव कधीच दिला गेला नाही. अकोल्यासह फक्त तीन जागा देण्यात आल्याचे प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


दरम्यान, शाहू महाराज यांना पाठिंबा जाहीर केल्यानंतर कोल्हापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष सतेज पाटील यांनी प्रकाश आंबेडकर यांचे आभार मानले आहेत. त्यांनी ट्विट करून समतेचा विचार आणि संविधान टिकवण्यासाठी आपला पाठिंबा आम्हांला निश्चितच बळ देईल, असे म्हटले आहे. 






प्रकाश आंबेडकर शेडगेंच्या भेटीवर काय म्हणाले?


दरम्यान महाविकास आघाडीमधील जागा वाटपावर प्रकाश आंबेडकर यांनी तुम्ही ते त्यांनाच विचारा अशी प्रतिक्रिया दिली. दरम्यान आज (23 मार्च) प्रकाश शेंडगे यांनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली. यावेळी शेंडगे यांनी ओबीसी पक्षाच्या जागांची यादी आंबेडकरांकडे सादर केली. यावेळी त्यांना आमचं महाविकास आघाडीकडे घोंगडं भिजत असल्याचे त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले. त्यामुळे तुमच्यासोबत आम्ही चर्चा पुढे करू शकत नसल्याचे त्यांना सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले. 


प्रकाश आंबेडकर कोडी टाकतात की वस्तुस्थिती दर्शवतात?


महाविकास आघाडीकडून प्रकाश आंबेडकरांकडून कोडी टाकली जातात, असे बोलले जात असल्याचे विचारले असता त्यांनी प्रकाश आंबेडकर कोडी टाकतात की वस्तुस्थिती दर्शवतात? अशी विचारणा केली. आम्हाला सहकार्य केलं असतं, तर हे जागा वाटपाचं घोंगडं भिजत राहील नसतं असेही प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे, दरम्यान, तुमचं टार्गेट वंचित बहुजन आघाडी राहिली असून त्यामध्ये खरं तर त्यांच्यामध्ये अजूनही तिढा असून तो तुम्ही दाखवायला हवा प्रकाश आंबेडकर म्हणाले. 


तर आम्ही एन्ट्री करुन करायचं?


त्यांच्या बैठकांमध्ये भांडण होत असेल, तर आम्ही त्यामध्ये कसं शिरायचं असंही प्रकाश आंबेडकर म्हणाले. महाविकास आघाडीकडून जागावाटपाचा तिढा संपल्याचे बोलण्यात येत आहे. मात्र, आमच्याकडे अजून त्या प्रकारे कोणतीही बोलणी केली नसल्याचे त्यांनी सांगितले. जागा वाटपामध्ये तिढा मिटत नसेल तर आम्ही एन्ट्री करुन करायचं? असेही ते यावेळी म्हणाले. आम्हाला कोणाला काही कळवण्याची गरज नाही, आम्ही जनतेला सर्व काही कळवू. 26 तारखेला आम्ही पुढील निर्णय घेणार आहोत, त्यावेळी आमची भूमिका स्पष्ट करू असे प्रकाश आंबेडकर यावेळी म्हटले. 


 इतर महत्वाच्या बातम्या