Ajit Pawar: पी. एन. साहेब आणि विलासराव देशमुख यांचे संबंध सांगत असताना लातूर आणि सडोली खालसा एक समीकरण होतं. आता यापुढे सडोली खालसा आणि काटेवाडी नात कसं असेल हा संपूर्ण महाराष्ट्र पाहेल, काळजी करू नका तुमच्या सगळ्यांच्या मनामध्ये जे आहे ते येणाऱ्या काळात पूर्ण करू, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील गटाचा आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांच्या उपस्थितीत प्रवेश झाला. पी. एन. पाटील यांचे चिरंजीव राहुल आणि राजेश पाटील यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. पी एन साहेब आज नसले तरी ते आज आपल्याला पाहत आहेत. आपला कार्यकर्ता कसा वागतो हे ते पहात आहेत, असे अजित पवार यावेळी म्हणाले. पी एन साहेब यांनी राजीव गांधी यांना नेता मानलं, नंतर विलासराव देशमुख यांना नेता मानलं, त्याना कधी सोडलं नसल्याचे त्यांनी सांगितलं.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार
अजित पवार म्हणाले की, राज्याच्या विकासासाठी शेतकरी, तरुण-तरुणी मागे राहू नये यासाठी आम्ही शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचार न सोडता सत्तेत सहभागी झालो आहोत. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी राज्यात सर्वात आधी बेरजेचे राजकारण सुरू केलं. सर्वधर्मसमभावविचार घेऊन चालणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे.. आश्वासक चेहरा म्हणून तुम्ही राहुल पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडे पाहत आहेत. तुमच्या पक्षप्रवेशामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कोल्हापूर जिल्ह्यात ताकद वाढणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खूप मोठा फायदा होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
लोकसभा निवडणुकीनंतर खचलो नाही
ते पुढे म्हणाले की, मित्रांनो मी कामाचा माणूस आहे. जन्माला आल्यानंतर समाजासाठी काम करायला पाहिजे. शेतकऱ्यांना कुठंही अडचण येणार नाही यासाठी काम करायचं असतं. लोकसभा निवडणुकीनंतर खचलो नाही, आम्ही जनतेच्या दारात पुन्हा गेलो. घेतलेलं कर्ज परतफेड करणारा शेतकरी हा केवळ कोल्हापूर जिल्ह्यात पाहायला मिळते. आम्ही शेतकऱ्यांना सोलरवर वीज देण्याचा निर्णय घेतला असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या