Almatti Dam : गेल्या चार दिवसांपासून राज्यात होत असलेल्या सर्वदूर पावसाने नद्या तसेच धरणांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यासाठी पावसाळ्यात नेहमीच टांगती तलवार असलेल्या अलमट्टी धरणातून गेल्या दोन दिवसांपासून प्रचंड प्रमाणात विसर्ग सुरु करण्यात आला आहे. 


अलमट्टी धरणातून  दीड लाख क्युसेक्सने विसर्ग सुरु असल्याने कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तसेच सांगली जिल्ह्याला मोठा दिलासा मिळाला आहे. सांगली जिल्ह्यातील आयर्विन पुलाजवळ कृष्णेची पातळी 24 फुटांवर गेली आहे.  दुसरीकडे कोयना धरणातही पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात होत असल्याने धरण भरल्यानंतर कृष्णेत विसर्ग सुरु होईल. त्यामुळे अलमट्टीमधील पाण्याची आवक आणि विसर्ग यामध्ये समन्वय ठेवल्यास ठेवल्यास निश्चित पुराचा धोका कमी होण्यास मदत होईल, यात शंका नाही. अलमट्टी धरणातून आज दुपारनंतर पावणे दोन लाख क्यसेक्सने विसर्ग करण्यात येणार आहे. 


हिप्परगी धरणाची सर्व दारे उघडल्याने अलमट्टीतून विसर्ग वाढवला 


सध्या कोयना धरण 78.48 टक्के भरले आहे, तर अलमट्टी 94.46 टक्के भरले आहे. अलमट्टी पाणी क्षमता 123.05 इतकी आहे. आता 117 टीएमसी भरले आहे. दरम्यान, कृष्णा नदीवरील हिप्परगी (ता. जमखंडी, जि. बागलकोट) येथील धरणाची सर्व दारे खुले करून सर्व पाणी अलमट्टी धरणाकडे सोडण्यात आले आहे. हिप्परगी धरणाची 6 टीएमसी क्षमता आहे. सध्या  महाराष्ट्रातून 79 हजार 492 क्यूसेक पाणी अलमट्टीकडे जात आहे. हिप्परगी धरणाचे सर्व दारे उघडल्याने अलमट्टी धरणातून 1 लाख 25 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे.


गेल्या दोन दिवसांपासून धरण व पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील कृष्णा, वारणा, पंचगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने पाणी पात्राबाहेर पडले आहे.  गेल्या पंधरा दिवसापासून पावसाने उसंत देऊन उन्हाळ्याप्रमाणे कडकडीत ऊन पडत होते. त्यामुळे शेतकऱ्यांना चिंता लागून राहिली होती. मात्र, मान्सून पुन्हा सक्रिय झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या