Kolhapur Municipal Corporation: जवळपास गेल्या 32 महिन्यांपासून कोल्हापूर महापालिकेला नगरसेवक, महापौर नसल्याने शहराची अवस्था अत्यंत दयनीय झाली असतानाच आता भरीत भर म्हणून की काय 50 दिवसांपासून आयुक्त सुद्धा नसल्याने शिंदे फडणवीस सरकार कोल्हापूर महापालिकेला बेवारस का घोषित नाही? किंवा उत्तर कर्नाटकला लागून असल्याने कर्नाटकमध्येच समावेश करण्याची भूमिका का जाहीर करत नाही? अशी संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे. 


कोल्हापूर महापालिकेची मुदत 15 नोव्हेंबर 2020 रोजी संपली आहे. तेव्हापासून महापालिकेवर प्रशासकराज आहे. प्रशासकराज रडतगडत सुरु असतानाच प्रशासक डाॅ. कादंबरी बलकवडे यांची 2 जून 2023 रोजी कोल्हापुरातून पुण्यात बदली झाली. तेव्हापासून कोल्हापूर शहरासाठी महापौर नगरसेवक सोडाच, पण आयुक्त सुद्धा नाहीत अशी स्थिती झाली आहे. कोल्हापूर शहरात गेल्या चार दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी सोडाच, पण आयुक्तही नसल्याने पुराचे नियोजन करायचे तरी कसे? असा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील नागरी सुविधांचा पूर्णत: बोजवारा उडाला आहे.


शहरातील महापुराच्या वेदना अंगाचा थरकाप उडवणाऱ्या असल्याने चोख नियोजनाची गरज असतानाच पालिकेत आयुक्त नाहीत अशी स्थिती आहे. सध्या काळजीवाहू म्हणून जिल्हाधिकारी राहुल रेखावार जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, त्यांच्याच खांद्यावरील अन्य जबाबदारी पाहता महापालिकेत किती लक्ष घालणार? हा संशोधनाचा भाग आहे. ज्या पालिकेतील कर्मचारी, अधिकारी आयुक्त असतानाही कोणालाही जुमानत नाहीत त्या ठिकाणी कोणीच नसताना कोणत्या लेव्हलचा कारभार होत असेल, हा सुद्धा कळीचा मुद्दा आहे. मनपामध्ये आयुक्त पद रिक्त असतानाच उपायुक्त, सहाय्यक आयुक्त, आरोग्याधिकारी, नगररचना विभाग सहाय्यक संचालक पदेही रिक्त आहेत. यामधील उपायुक्तपदी शुक्रवारी साधना पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 


शहराचे प्रचंड नुकसान, सतेज पाटील यांची टीका


माजी पालकमंत्री आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेला गेले दोन महिने आयुक्त नसल्याबद्दल सडकून टीका केली आहे. ते आज बोलताना म्हणाले की, भाजपने दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचं की शिवसेनेने दिलेल्या अधिकाऱ्याचे नाव घ्यायचं हा वाद आहे. मात्र, यांच्या वादामध्ये शहराचे प्रचंड नुकसान होत आहे.


नेमके आयुक्त देणार आहेत तरी कधी?


प्रजासत्ताक सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष दिलीप देसाई यांनीही अत्यंत कडक शब्दात कोल्हापूर मनपाच्या दयनीय स्थितीवरून प्रतिक्रिया दिली आहे. कोल्हापूरला नगरसेवक, महापौर नाहीत. अशा परिस्थितीत  गेल्या अनेक दिवसांपासून मनपाचा कारभार सुरु आहे. अधिकारी कोणालाही जुमानत नाहीत कारण आयुक्त नाहीत. हा कारभार चालवत कोण ते ते जिल्हाधिकारी. त्यांना काडीमात्र वेळ नाही. अनेक विभागाचे कामकाज ठप्प आहे. बांधकाम विभाग, आरोग्य सुविधा असूदेत, रस्ते, पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे. त्यामुळे नेमके आयुक्त देणार आहेत तरी कधी? आयुक्त नेमण्यामागे काही नियोजन आहे का? ते जनतेसमोर आलं पाहिजे. त्याचे दर ठऱल्याचे बोलले जात आहे ते समोर आलं पाहिजे. या कोल्हापूरला सक्षम आयुक्त द्या, अशी मागणी त्यांनी केली. 


कोल्हापूरचे दुखणे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही का?


आयुक्त आणि इतर अधिकारी सुद्धा नसलेली राज्यातील कोल्हापूर महापालिका एकमेव असावी. ज्या ठिकाणी आयुक्त नाहीत आणि इतर रिक्त पदांवरही अधिकारी नाहीत. त्यामुळे कोल्हापूरचे दुखणे पालकमंत्री दीपक केसरकर यांना दिसत नाही की? फक्त स्वप्नांचा बाजार मांडणे हा त्यांचा प्रमुख कामकाजाचा भाग आहे, अशी शंका येऊ लागली आहे. केसरकर यांनी कोल्हापूरचे पालकमंत्री पदावरून स्वप्नांच्या पुड्या सोडण्याचेच काम केले असून वास्तवात एकही भरीव काम त्यांना अजून कोल्हापुरात पूर्णत्वास नेण्यात यश आलेलं नाही. हद्दवाढ, खंडपीठ, रस्ते प्रश्न जैसे थे आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या