NIA Raids PFI Maharashtra : दहशतवाद्यांना आर्थिक मदत केल्याप्रकरणी एनआयएकडून महाराष्ट्रासह देशभरात छापेमारी केली आहे. महाराष्ट्रातील गुप्तचर संस्थांनी तपास यंत्रणांना दिलेल्या माहितीनुसार, पीएफआयने पुणे जिल्ह्याला आपले मुख्य केंद्र तयार केले आहे. पुण्यातील काही ठिकाणी प्रशिक्षण केंद्र चालवले जात आहेत. शिवाय SDPI संघटनेकडून जालना आणि औरंगाबाद जिल्ह्यात सभासद नोंदणी सुरू केली असल्याचे गुप्तचर यंत्रणांनी म्हटले आहे. 


दरम्यान, एनआयएकडून राज्यामध्ये  मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, औरंगाबाद, कोल्हापूर, नांदेड, परभणी या जिल्ह्यांमध्ये एनआयए, महाराष्ट्र एटीएसने कारवाई केली आहे.


पीएफआय प्रकरणात कोल्हापूरमध्येही छापेमारी  


दरम्यान, एनआए आणि पीएफआय प्रकरणात कोल्हापूरमध्येही कारवाई करण्यात आली आहे. पीएफआयचा पदाधिकारी असल्याच्या संशयातून जवाहरनगरमधून एकाला ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. संशयिताच्या घराला सध्या कुलूप आहे. 


कोल्हापूरमध्ये एनआयएचा गैरसमज आणि कुटुंब भयभित


यापूर्वी 31 जुलै रोजी एनआयएकडून देशभरातील आयसिस माॅड्यूलचा नायनाट करण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सहा राज्यांमधील 13 जिल्ह्यांमध्ये काल धाड टाकण्यात आली होती.  यामध्ये राज्यातील नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्याचा समावेश होता. 


कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील रेंदाळमध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने इर्शाद शौकत शेख आणि अल्ताफ शौकत शेख यांना ताब्यात घेत चौकशी केली. सहा तासांच्या चौकशीनंतर केवळ नावामध्ये साधर्म्य असल्याचा साक्षात्कार एनआयए पथकाला झाला आणि त्यांना सोडून देण्यात आले होते. तोपर्यंत जमावाने त्यांच्या कार्यालयावर हल्ला करून नासधूस  केली होती. त्यामुळे संपूर्ण कुटुंब भयभित झाले होते.  


इर्शाद शेखकडून लब्बैक इमदाद फौंडेशन संस्था चालवली जाते. मात्र, तपास यंत्रणेला हवी असणारी आणि ही संस्था वेगळीच असल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले होते. मात्र, आपली मुलं देशविघातक कृत्य करू शकत नाहीत हे सांगताना दोन भावांच्या वृद्ध वडिलांना रडू कोसळले होते. पोलिसांनी परिस्थितीचे भान राखत घराला चोख बंदोबस्त दिल्याने आणि चौकशीअंती काहीच संबंध नसल्याचे लक्षात आल्यानंतर कुटुबीयांचा जीवात जीव आला होता.


इतर महत्वाच्या बातम्या