कोल्हापूर : करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या (Ambabai Mandir) भिंतीला खेटून असलेली चप्पल स्टँड आज कोल्हापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून हटवण्यात आल्यानंतर आज मोठा राडा झाला. पालिकेकडून (Kolhapur Municipal Corporation) कारवाई करण्यात आल्यानंतर खासगी दुकानदार आणि पालिका कर्मचाऱ्यांमध्ये मोठा वाद झाला. त्यामुळे यावेळी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून जेसीबीच्या सहाय्याने भिंतीला लागून असलेली दुकाने हटवली.  


महिलांकडून जोरदार विरोध 


अंबाबाई मंदिर (Ambabai Mandir) परिसरात खासगी दुकानदारांनी चप्पल स्टँड लावले आहेत. हे स्टँड हटवण्यासाठी प्रशासनाने आज कारवाईला सुरुवात केली. मात्र त्याला खासगी दुकानदारांनी विशेषत: महिलांनी जोरदार विरोध केला. करवीर निवासी अंबाबाई मंदिराची भिंत आहे. त्या भिंतीला लागूनच हे खासगी चप्पल स्टँड आहे. हे चप्पल स्टँड काढण्यासाठी आज मनपाच्या अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाईला सुरुवात केली. 



नवरात्रोत्सवाच्या तोंडावरुन मंदिर परिसरात साफसफाई सुरु आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिकेने अतिक्रमणविरोधी कारवाईही सुरु केली आहे. अंबाबाई मंदिराच्या तोंडावर जी मूळ भिंत आहे, ती भिंत भाविकांना दिसायला हवी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून होती. मात्र या भिंतीला लागूनच चप्पलांचे स्टँड आहेत. त्यामुळे मूळ बांधकाम नेमकं कसं आहे, मंदिराची रचना कशी आहे, हे या चप्पलस्टँड आड झाकलं गेलं आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने नवं आणि अधिकृत चप्पल स्टँड उभं केलं आहे. मात्र जे खासगी चप्पल स्टँड आहे त्यामुळे मंदिराचं मूळ बांधकाम झाकलं होतं. तेच हटवण्याचा प्रयत्न मनपाने केला आहे.


खासगी दुकानदारांचा विरोध का?


दरम्यान, आम्ही गेल्या 20-25 वर्षांपासून इथे चप्पल स्टँड लावत आहोत, हे चप्पलस्टँड हटवलं तर आम्ही करायचं काय असं या दुकानदारांचं म्हणणं आहे. या कारवाईविरोधात आम्हाला नोटीस वगैरे काही दिलं नाही. आम्हाला सरकारने न्याय द्यावा. आमचं 15-20 जणांचं चप्पलस्टँड आहे, हे सर्व प्रकरण कोर्टात आहे, तरीही मनपाने कारवाईला सुरुवात केली आहे, असा आरोप खासगी चप्पल स्टँड मालकांनी केली.


इतर महत्वाच्या बातम्या