कोल्हापूर : फक्त कोल्हापूरच नव्हे, तर राज्यासह देशाचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर लोकसभा मतदारसंघांमध्ये काँग्रेस उमेदवार शाहू महाराज छत्रपती यांनी एकतर्फी विजय मिळवला आहे. त्यांनी एकतर्फी लढतीमध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संजय मंडलिक यांचा पराभव केला. टपाली मतदानापासून घेतलेली आघाडी मतदानाच्या शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली. त्यामुळे शाहू महाराज यांनी एकतर्फी विजय मिळवला. मात्र, गड आला पण सिंह गेला अशी जिल्हा काँग्रेससह कार्यकर्त्यांची झाली आहे. करवीरमधूनच शाहू महाराज यांना सर्वाधिक लीड मिळाले आहे. मात्र, त्या मतदारसंघाचे पी. एन. पाटील यांचे अकाली निधन झाल्याने पोकळी निर्माण झाली आहे. 






ज्या मतदारसंघांमधून संजय मंडलिक यांना मताधिक्य मिळेल अशी चर्चा होती, त्या कागल चंदगड राधानगरी या तीन विधानसभा मतदारसंघांमधून सुद्धा शाहू महाराजांना तेथील जनतेने साथ दिल्याचे स्पष्ट झालं आहे. त्यामुळे संजय मंडलिक यांना मोठ्या पराभवला सामोरे जायला लागलं आहे. मात्र, शाहू महाराजांना सर्वाधिक मताधिक्य करवीर विधानसभा मतदारसंघातून मिळालं आहे. मात्र, या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे काँग्रेसचे आमदार पी. एन. पाटील यांचे 23 मे रोजी निधन झाल्याने हा विजय पाहण्यासाठी ते नसल्याने कार्यकर्ते भावूक झाले. त्यामुळे शाहू महाराजांना मोठं लीड देण्यामध्ये स्वर्गीय आमदार पी. एन. पाटील यांचा मोलाचा वाटा असल्याचे दिसून आले.  






शाहू महाराज यांना आपण उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पी. एन. पाटील यांनी पायाला भिंगरी लावून एक महिना प्रचार केला होता. 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात झालेल्या मतदानात करवीरमध्येच सर्वाधिक 80 टक्के मतदानाची नोंद झाली होती. त्यामुळे करवीरमधील मतदान हे शाहू महाराजांच्या विजयासाठी निर्णायक होते. आलेल्या निकालामध्ये सुद्धा करवीरने शाहू महाराजांना विजय निश्चित केल्याचे स्पष्ट झाला आहे. त्यामुळे गड आला पण सिंह गेला अशी म्हणायची वेळ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसह काँग्रेस नेतृत्व सुद्धा आली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या