Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी शहरात (Ichalkaranji Crime) भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात वृद्धेचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. नागव्वा अर्जुन कांबळे असे त्यांचे नाव आहे. मध्यरात्री भटक्या कुत्र्यांनी सुमारे दोन ते अडीच तास लचके तोडल्याने त्या रक्ताच्या थारोळ्यात पडल्या होत्या. उपचारासाठी त्यांना आययजीएममध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान मृत्यू झाला.


कांबळे शुक्रवारी मध्यरात्री दोन-अडीच वाजण्याच्या सुमारास शौचालयासाठी घराबाहेर पडल्या होत्या. मात्र, पहाटे सुमारास फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या नागरिकांना महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. त्यांच्या आजूबाजूला भटकी कुत्री उभी होती. कुत्र्यांना हुसकावत नागरिकांनी त्यांना तत्काळ पहाटे पाचच्या सुमारास आयजीएम रुग्णालायत दाखल केले. कुत्र्यांच्या हल्ल्यात त्या गंभीर जखमी झाल्या होत्या. धक्कादायक म्हणजे वृद्धेचे शवविच्छेदन सुरू असतानाच कुत्र्यांनी आणखी एका लहान मुलाचा लचका तोडल्याची घटना घडली. 


पाच महिन्यांत दोन हजारांवर घटना


आयजीएममधील नोंदीनुसार (Ichalkaranji Crime) पाच महिन्यांमध्ये दोन हजार नागरिकांचा कुत्र्यांनी चावा घेतला आहे. भटक्या कुत्र्यांच्या बंदोबस्तासाठी अनेक संघटनांनी आंदोलने सुद्धा केली आह मात्र महापालिका प्रशासन केवळ कायदा पुढे करीत पळवाट काढत आहे. शहरातील बहुतांश भागांत भटक्या कुत्र्यांची दहशत आहे. या आधी निष्फळ ठरलेल्या निर्बीजीकरण मोहिमेवर महापालिका भर देत आहे; पण, भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव रोखायचा कसा, याचे उत्तर मात्र प्रशासनाकडेही नाही.


कोल्हापुरातही प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य


दरम्यान, कोल्हापुरातील ऐतिहासिक बिंदू चौक नेहमीच पर्यटकांनी गजबलेला असतो. मात्र, त्याच बिंदू चौकात डिसेंबर महिन्यातील शेवटच्या आठवडाभरात तीन पर्यटकांचा भटक्या कुत्र्यांनी लचका तोडला होता. कोल्हापूर शहराच्या (Kolhapur Crime) प्रमुख भागांमध्ये भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य आहे. वाहन वेगाने गेल्यानंतर कुत्री वाहनांचा पाठलाग करतात. बिंदू चौक, मटण मार्केट परिसरात कुत्र्यांच्या चांगल्याच टोळ्या आहेत. रात्री दहा ते पहाटेपर्यंत त्यांचा ठिय्या असतो.


ठिय्या मारुन कुत्री बसल्याने काही वेळेला चार चाकी वाहनधारकांना रस्त्यावरच थांबावे लागते. तसेच कचरा कोंडाळ्यासह मटण, चिकनची दुकाने, चायनीज दुकाने, कत्तलखाने परिसरात कुत्र्यांच्या झुंडींची दहशत आहे. चायनीजच्या हातगाड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहे. चायनीजमधील कामगार जवळील कचरा कोंडाळी किंवा अनेकदा गटारीच्या कडेला टाकतात. शिल्लक अन्न, मांस, हाडे रस्त्याच्या कडेलाच टाकली जात असल्याने कुत्र्यांना हे खाद्य मिळते. 


इतर महत्वाच्या बातम्या