Jotiba chaitra yatra : दख्खनचा राजा श्री जोतिबा यात्रा कालावधीत शेंड्या (केसर) काढलेल्या नारळाचीच विक्री करण्याचा आदेश प्रशासनाकडून जारी करण्यात आला आहे. नारळाच्या शेंड्यांनी मंदिर परिसरात कचरा होऊ नये यासाठी फौजदारी दंड संहिता 144 अन्वये कार्यकारी दंडाधिकारी तथा पन्हाळा तहसीलदार रमेश शेंडगे यांनी प्रतिबंधात्मक आदेश काढला असून तो व्यापाऱ्यांना लागू करण्यात आला आहे. हा आदेश 3 एप्रिल रोजी रात्री बारा वाजल्यापासून ते गुरुवारी 6 रोजी रात्री बारापर्यंत आदेश लागू राहणार आहे. या आदेशानुसार सर्व व्यापाऱ्यांना नारळाच्या शेंड्या काढूनच विक्री करावी लागणार आहे. 


तसेच नारळ फोडणाऱ्या पुजाऱ्यांना शेंड्या काढून कचरा करण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे आदेशात म्हटले आहे. दरम्यान, जोतिबा यात्रेसाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे. यात्रेसाठी संपूर्ण महाराष्ट्रासह आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक आणि गोव्यातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. या कालावधीत सुमारे आठ ते दहा लाखांवर भाविकांची डोंगरावर उपस्थिती असते. 


मंदिरात श्रद्धेपोटी नारळ फोडले जातात. मात्र, नारळ फोडताना शेंड्या काढून भावी कोठेही टाकून जातात. त्यामुळे मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो. यामुळे अपघात होण्याची शक्यताही शक्यता असते. त्यामुळे तोडगा म्हणून शेंडी काढून नारळ विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला. 


डोंगर मार्गावर दुतर्फा पार्किंगला मनाई 


दरम्यान, श्री क्षेत्र जोतिबा डोंगरावर 3 ते 5 एप्रिल या कालावधीत चैत्र पौर्णिमा  यात्रा  होत  आहे. यात्रा कालावधीत जोतिबा  डोंगरावर  येणाऱ्या  भाविकांची सुरक्षा, मोटार वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी राहुल रेखावार यांनी  पोलीस अधीनियम 1951 कलम 34 अन्वये 3 एप्रिल रोजी सकाळी 8 वाजल्यापासून 5 एप्रिल रोजी रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक नियमन आदेश जारी केले आहेत.


श्री क्षेत्र वाडी रत्नागिरी या ठिकाणी जोतिबा यात्रा सुरळीत पार पाडण्यासाठी वाहतूक परिस्थिती विचारात घेत जुने आंब्याचे झाड, (दानेवाडी क्रॉसिंग) ते जुने एसटी बसस्थानक, मेन पार्किंग- यमाई पार्किंग ते गिरोली फाटा ते दानेवाडी फाटा, दानेवाडी फाटा ते दानेवाडी क्रॉसिंग या दरम्यानच्या मार्गावर सर्व प्रकारच्या मोटार वाहनांना रस्त्याच्या दोन्ही बाजूस थांबण्यास व पार्किंग करण्यास मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या