Sumangalam Lokotsav : संपूर्ण विश्वापुढे पर्यावरणाचा प्रश्न आ वासून उभा आहे. दिवसेंदिवस वैश्विक तापमान वाढत आहे. त्यामुळे ऋतुमानात सातत्याने बदल होत आहेत. या बदलत्या ऋतुमानामुळे अनेक जागतिक समस्या निर्माण झाल्या आहेत. या समस्यांना अटकाव करायचा असेल तर वेळीच पर्यावरण संवर्धनाकडे लक्ष द्यायला हवे. हे लक्ष देत असतानाच पर्यावरण संवर्धनासाठी लोक जागृती व लोक सहभाग आवश्यक असल्याचे प्रतिपादन कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी केले. श्री क्षेत्र सिद्धगिरी महासंस्थान आयोजित ‘सुमंगलम लोकोत्सवा’निमित्त  (Sumangalam Lokotsav) आयोजित ‘संत समागम एवं कुलपति समागम’ या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर गोवा राज्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, भैय्याजी जोशी, आमदार सुभाष देशमुख, काडसिध्देश्वर स्वामी महाराज आदी उपस्थित होते.


कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गेहलोत पुढे म्हणाले की, संत, ऋषी, मुनी यांनी प्राचीन काळापासून पर्यावरण संवर्धनाचे महत्व विषद केले आहे. पर्यावरणाच्या मुद्याकडे आपणाला दुर्लक्ष करुन चालणार नाही. पर्यावरण रक्षणासाठी आपल्या सर्वांना कटिबद्ध व्हावे लागेल. साधू, संतांच्या मार्गदर्शनात समाज आपले आचरण, अनुसरण करतो. या महोत्सवाकरिता उपस्थित असलेल्या साधू संतांनी पर्यावरणाच्या दृष्टीने समाजाला प्रेरित करावे. पर्यावरणाचे रक्षण करतानाच जल संरक्षणाकडे दुर्लक्ष करुन चालणार नसल्याचेही गेहलोत म्हणाले.


प्रदर्शन आणखी पाच दिवस सुरु ठेवावे


गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ‘सुमंगलम पंचमहाभूत लोकोत्सव’ प्रदर्शन येणाऱ्या आगामी पिढीसाठी मार्गदर्शक ठरेल. या प्रदर्शनाचे दृष्य परिणाम लवकरच दिसून येतील. हे प्रदर्शन म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पनेतील ‘आत्मनिर्भर भारताचे’ प्रतिबिंब आहे. भारत विश्व गुरु होण्यासाठी येथे उपस्थित असलेल्या साधु संतांचे आशिर्वाद मिळावेत, मुदत संपल्यानंतरही हे प्रदर्शन आणखी पाच दिवस सुरु ठेवावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.


दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे


श्री क्षेत्र गुंटूचे शिवाराथी देशिकेंचे महास्वामी अध्यक्षस्थानावरुन बोलताना म्हणाले की, पंचमहाभूताचे अस्तित्व कोणालाही नाकारता येणार नाही. निसर्गाचे रक्षण करणे हे सर्वांचे परम कर्तव्य आहे. पृथ्वी प्रदूषित करण्याला जेवढे हात कारणीभूत आहेत त्याच्या दुप्पट हातांनी पृथ्वीचे पर्यायाने निसर्गाचे संवर्धन व्हावे, निसर्गाप्रती सर्वांच्या मनात आदर आणि जागृती निर्माण व्हावी. या संमेलनासाठी आतापर्यंत लाखो लोकांनी उपस्थिती दर्शविली यातच हा महोत्सव यशस्वी झाल्याचे दिसून येत असल्याचे गौरवोग्दारही त्यांनी यावेळी काढले.


हा महोत्सव यशस्वी केल्याप्रित्यर्थ सर्व साधू संतांच्या वतीने काडसिध्देश्वर स्वामी महाराज यांचा वेद घोषाच्या मंत्रात यावेळी गणेश मूर्ती व शाल देवून राज्यपाल गेहलोत यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याप्रसंगी भैय्या जोशी यांनीही आपले विचार व्यक्त केले. तत्पूर्वी, सकाळच्या सत्रात देशभरातून आलेल्या विविध जाती-धर्माच्या साधू संतांचे पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने करण्यात येणाऱ्या विविध उपाययोजनांच्या अनुषंगाने चर्चासत्र संपन्न झाले.


इतर महत्वाच्या बातम्या