Congress Protest in Kolhapur : देशात दिवसागणिक सुरु असलेला महागाईचा आगडोंब आणि वाढत चाललेली बेरोजगारी तसेच ईडीच्या माध्यमातून देशभरात सुरु असलेल्या विरोधकांवरील कारवाईवरून काँग्रेसने आज देशव्यापी एल्गार केला आहे. गल्ली ते दिल्लीपर्यंत काँग्रेसने रस्त्यावर उतरताना मोदी सरकारचा निषेध करताना चलेजावच्या घोषणा दिल्या. 


कोल्हापुरात देखील काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत केंद्र सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी   मोदी सरकार चलेजावच्या घोषणा दिल्या. 


केंद्र सरकारविरोधात आज काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलनाची हाक देण्यात आली. या पार्श्वभूमीवर दिल्लीसह मुंबई आणि नागपुरातही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले. मुंबई आणि नागपूरमध्येही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांची धरपकड सुरु केली. मुंबईतही पोलिसांनी काँग्रेस कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. मुंबईत पोलिसांनी नाना पटोले यांना ताब्यात घेतले.


याशिवाय पुण्यातही काँग्रेस नेत्यांची धरपकड करण्यात आली. दिल्लीमध्ये राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी काळे कपडे परिधान करत महागाई आणि बेरोजगारीवरून केंद्र सरकारचा निषेध केला. या आंदोलनात काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनीही सहभाग घेतला. 


राहुल गांधी यांनी केला मोदी सरकारवर हल्लाबोल 



  • देशात लोकशाहीची हत्या सुरु आहे. देशामध्ये चार लोकांची हुकुमशाही सुरु आहे. सध्या देशातील परिस्थिती भयानक आहे.

  • काँग्रेसनं (congress) जे 70 वर्षात कमावलं ते भाजपनं (BJP) 7 वर्षात गमावलं आहे. आम्ही एका राजकीय पक्षाशी लढत नाहीत तर आम्ही संपूर्ण पायाभूत सुविधांशी लढत आहोत.

  • जर कुणी विरोधकांना पाठिंबा देत असेल तर त्याच्या मागे ईडी आणि सीबीआय लावले जाते. त्यामुळे विरोधकांचा प्रभाव दिसत नाही.

  • अर्थमंत्र्यांना महागाई का दिसत नाही हेच कळत नाही.  ते म्हणतात स्टार्टअप इंडिया आहे, सांगा कुठे आहे स्टार्टअप इंडिया. लोकांना नोकरीवरुन काढलं जात आहे.

  • सरकारचं म्हणणं आहे की, कोरोनामध्ये एकही मृत्यू झाला नाही. 5 दशलक्ष लोक मरण पावले असे संयुक्त राष्ट्र म्हणत आहे, परंतु सरकार म्हणत आहेत की हे सर्व खोटे आहे.

  • बेरोजगारीबाबत सरकार म्हणते की यात तथ्य नाही. त्यांच्या हातात सगळी संवादाची साधनं आहेत.

  • जेवढं मी बोलेन, तेवढी माझ्यावर कारवाई केली जाईल. पण मी घाबरत नाही. आता माझ्यावर आणखी हल्ले होतील. जो धमकावतो तो घाबरत असतो. या लोकांना भारताच्या आजच्या परिस्थितीची भीती वाटते. त्यांनी दिलेल्या आश्वासनांची त्यांना भीती वाटते.

  • केंद्र सरकार लोकांच्या ताकतीला घाबरतं. महागाई आणि बेरोजगारीची भीती या लोकांना आहे. हे लोक 24 तास खोटे बोलण्याचे काम करतात

  • केवळ काँग्रेसच नाही तर देशातील कोणताही अभिनेता किंवा कोणीही व्यक्ती सरकारच्या विरोधात बोलला तर त्याच्यामागे संपूर्ण यंत्रणा उभी केली जाते.

  • भारतात लोकशाही संपली आहे. त्याचे परिणाम भोगावे लागतील. भारतीय जनता गप्प बसणार नाही