Dhairyasheel Mane : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवेसेनेला खिंडार पाडल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातही त्याचे पडसाद उमटले. आमदार प्रकाश आबिटकर, राजेंद्र पाटील यड्रावकर, राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार राजेश क्षीरसागर तसेच खासदार संजय मंडलिक आणि धैर्यशील माने यांनी बंडखोरी करत शिंदे गटात सामील झाले.


मात्र, नेत्यांकडून झालेली बंडखोरी अजूनही शिवसैनिकांना रुचलेली नाही. बंडखोरांना सोशल मीडियासह सभेमध्येही त्याचा सामना करावा लागत आहे. आता या यादीमध्ये धैर्यशील माने यांचीही भर पडली आहे. काल केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर होते. या दौऱ्यावेळी कोल्हापूर विमानतळासंदर्भात बैठक पार पडली. 


या बैठकीसाठी धैर्यशील माने यांचीही उपस्थिती होती. बैठकीनंतर त्यांनी सोशल मीडियातून पोस्ट करत माहिती दिली. त्यांनी माहिती देतानाच बंडखोरी केल्यापासून बंद असलेला कमेंट सेक्शन बंद असलेला सुरु केला. मात्र, त्या पोस्टवरून कौतुक किंवा समर्थन होण्याऐवजी त्यांचे सडकून ट्रोलिंग झाले. त्याचबरोबर पोस्टवर हसणारेही वाढत चालले होते.  



ट्रोल करत शिवसैनिकांनी चांगलाच समाचार घेतल्याने अखेर धैर्यशील माने यांनी पुन्हा एकदा कमेंट सेक्शन बंद केला आहे. त्यामुळे त्याची पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. गद्दार, आता माजी खासदार, परत येणार नाही, अतिशय लहान वयात राजकीय आत्महत्या केली, कार्यकर्ते हा शब्द विसरून जावा #माजी खासदार साहेब, सर्व कमेंट्स वाचा आणि आताच राजकीय संन्यास घेण्याची मानसिकता करून ठेवा, अशा शब्दांमध्ये त्यांना ट्रोल करण्यात आले होते. 


माने घराला तब्बल अडीच दशकांचा राजकीय वारसा


जिल्ह्याच्या राजकारणात सध्या तिसरी पिढी कार्यरत आहे. त्यामुळे माने घराण्याला राजकीय वारसा खूप मोठा आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघामध्ये बाळासाहेब माने काँग्रेसकडून यांनी तब्बल पाचवेळा प्रतिनिधीत्व केले. 1977 पासून ते 1991 च्या निवडणुकीपर्यंत ते सलग विजयी झाले. याच मतदारसंघातून धैर्यशील माने यांच्या मातोश्री निवेदिता माने यांनीही दोनवेळा प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांचीच राजकीय परंपरा धैर्यशील माने यांना लाभली आहे. अगोदर हा इचलकरंजी मतदारसंघ होता, पण 2008 मध्ये पुर्नरचना झाल्याने हा मतदारसंघ हातकणंगले मतदारसंघ झाला. या मतदारसंघात सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर आणि शिराळ्याचा भाग समावेश आहे. 


सगळं देऊनही बंडखोरी का केली? हे कोडे कार्यकर्त्यांना सुटेना 


जो मातोश्रीवर सहज प्रवेश मिळत नाही, तो धैर्यशील माने यांना सहज मिळाला होता. इतकचं नाही, तर खासदार झाल्यानंतर त्यांना प्रवक्तेपदी दिले. मुळचे शिवसैनिक नसतानाही पक्षाकडून उचित सन्मान राखला गेला. असे असूनही शिंदे गटात धैर्यशील माने यांनी जाण्याचा निर्णय का घेतला? याचीच चर्चा मतदारसंघात रंगली आहे. हातून काहीच ठोस काम झालं नसल्याने मतदारसंघातील कोरे-आवाडे-महाडिक-हाळवणवकर गटाचा फायदा आपल्याला 2024 मध्ये होईल, या अंदाजाने शिंदे गटात गेल्याची चर्चा रंगली आहे.  


इतर महत्वाच्या बातम्या