कोल्हापूर : जी खासदार संभाजीराजे छत्रपतींच्या नेतृत्वात किल्ले विशाळगडावरील (Vishalgad) अतिक्रमण मुक्ती आंदोलनाला हिंसक वळण लागले. विशाळगड परिसरातील वाहनांची तोडफोड तसेच घरांची देखील तोडफोड करण्यात आली. त्यानंतर आता कोल्हापूर पोलिसांकडून गुन्हे नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली असून संभाजीराजेंसह (Sambhajiraje) 500 जणांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी घेतलेल्या भूमिकेवरुन आता चांगलाच वादंग उठला आहे. स्वत: शाहू महाराज छत्रपतींनी देखील संभाजीराजेंच्या भूमिकेचा निषेध व्यक्त केला आहे. आता, कोल्हापुरातील मुस्लिम (Muslim) बोर्डिंगच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना पत्र लिहून संभाजीराजेंना अटक करा, अशी मागणी केली आहे. 


14 जुलै 2024 रोजी काही समाजकंटकांनी पध्दतशीर नियोजनबध्दपणे विशाळगड अतिक्रमण विषयी मोर्चेचे नियोजन केले होते. सदर मोर्चेला काही समाजकंटकांनी हिंसक वळण दिले व गजापूर मुसलमानवाडी येथील अल्पसंख्यांक मुस्लिम समाजातील घरांवर दगडफेक, प्रार्थनास्थळावर दगडफेक, तोडफोड आई-बहीण व लहान मुलांवर क्रूर पध्दतीने मारहाण व अत्याचार करण्यात आले आहेत. हे कृत्य पुरोगामी कोल्हापूरला अशोभनीय आहे. सदर समाजकंटकांचे नेतृत्व करणारे संभाजी राजे व स्वराज्य संघटनेचे पदाधिकारी तसेच दंगलचे सुत्रधार पुण्याचा रविंद्र पडवळ यांच्याकडून प्लानिंग करून सद पुरविली गेली. जमावबंदी आदेश असताना सदर मोर्चा निघाला कसा ? तसेच विशाळगड अतिक्रमण काढणेसंदर्भात मोर्चेचे नियोजन केले होते. त्यांच्याकडून दर्ग्यावर हल्ला झाला. गजापूरमध्ये अतिकमणाचा कोणताही विषय नसताना मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले. पोलीसांना मारहाण, पत्रकारांना धमकावणे अशाप्रकारे निंदनीय घडले. या सर्व प्रकारामध्ये सरकारी कामात अडथळा आणला व गंभीर जखमी असे प्रकार घडले सदरची सर्व कलमे यांच्यावर लावली पाहिजेत. सदर घटनेमुळे कोल्हापूरात जातीय तणाव झाला याला सर्वस्व जवाबदार संभाजीराजे आहेत म्हणून संभाजीराजे यांना ताबडतोब अटक व्हावी, व त्यांच्यावर कडक कारवाई अशी मागणी द मोहम्मद एज्युकेशन सोसायटी व मुस्लीम बोर्डींगने केली आहे. 


विशाळगडवर जाणेकरिता एकच रस्ता आहे, सदर रस्त्यावर जाणेकरिता पोलिसांनी हत्यारसह समाजकंटकांना सोडण्यात आले, याला सर्वस्व जबाबदार पोलीस प्रशासन आहे. अतिकमण हिंदू मुस्लिमांचे असताना सदर ठिकाणी फक्त मुस्लिम समाजावर अत्याचार करण्यात आले. गजापूर मुसलमनवाडी या ठिकाणी पोलीसांनी सुरक्षा दिली नाही व फक्त बघ्याची भुमिका घेतली. त्यामुळे पोलीस प्रशासन पुर्णपणे जबाबदार आहे. तरी पोलीस अधिक्षक, कोल्हापूर यांची ताबडतोब बदली करणेत यावी अशी समस्त मुस्लिम समाज कोल्हापूर यांच्या वतीने विनंती असल्याचंही या पत्रात म्हटलं आहे.  सर्व स्वराज्य संघटनेचे नेतेमंडळी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यावर भारतीय संविधानानुसार कडक कलमे लावून सरकारी कामात अडथळा, पोलीसांवर तलवारहल्ला, महिलांचे विनयभंग तसेच जीवे मारणेच्या उद्देशाने हल्ला घरफोडी व लुटालुट, प्रार्थनास्थळावर दगडफेक, धार्मिक ग्रंथ पेटवणाऱ्यांवर समाज कंटकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी समाजाची कळकळीची विनंती आहे. काही ठराविक मंडळीकडून कोल्हापूर जिल्हयात जातीय दंगली घडविण्याचे प्रकार वारंवार होत आहेत. तरी अशा समाजकंटकावर कठोर शासन व्हावे, अशी विनंती आहे. अन्यथा समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन व विराट मुकमोर्चा काढू असेही समस्त मुस्लिम समाजाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे. 


शाहू महाराजांकडून संभाजीराजेंच्या भूमिकेचा निषेध


विशाळगड किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याच्या निमित्ताने झालेला हिंसाचार प्रचंड वेदनादायी असू आम्ही त्याचा निषेध करतो. राजर्षी शाहू महाराजांच्या विचाराने प्रगल्भ असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यात अशी घटना होते हे अत्यंत क्लेशदायक आहे. यासंदर्भात प्रशासनाने माजी खासदार संभाजीराजे आणि मुख्यमंत्री यांची भेट तसेच चर्चा घडवून आणावी अशा सूचना आम्ही जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रमुखांना घटनेपूर्वी दिल्या होत्या. परंतु ते गांभीर्याने घेण्यात आलं नाही. त्यानंतर ही घटना घडली, हे प्रशासनाचे अपयश आहे. माजी खासदार संभाजीराजे यांनी या प्रश्नी आंदोलनाचे नेतृत्व केले आणि सुरूवातीपासून आक्रमक भूमिका घेतली. परंतु त्यांच्या आक्रमक भूमिकेनंतर जो हिंसाचार झाला त्याचा आम्ही स्पष्ट शब्दात निषेध करतो. हिंसाचारामध्ये ज्या निष्पाप लोकांचे नुकसान झाले त्याना सरकारने तातडीने नुकसान भरपाई द्यावी. सरकारने काहीकेलं नाही तर कोल्हापूरची जनता त्यासाठी पुढाकार घेईल. 


पालकमंत्र्यांच्या आदेशानं गुन्हा दाखल करायचा का?


मी आक्रमक होतो पण मी माझ्या स्वर्थासाठी नाही तर शिवाजी महाराज यांच्या विशाळगडावर झालेल्या अतिक्रमणामुळे आक्रमक झालो, या सगळ्यासाठी मी आक्रमक झालो असेल तर मला गर्व असल्याची प्रतिक्रिया माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली आहे. तसेच, पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे समजताच संभाजीराजे शाहूवाडी पोलिस स्टेशनला हजर झाले आहेत. मात्र, त्यांनी पोलिस थेट माहिती देत नसल्याचा आरोप केला आहे. पालकमंत्र्यांच्या आदेशानं गुन्हा दाखल करायचा आहे का? अशी विचारणा त्यांनी केली. ते म्हणाले की, माझ्यावर गुन्हा दाखल केला असे समजलं म्हणून मी स्वतः पोलीस ठाण्यात आलो.