Kolhapur : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 अंतर्गत पीक कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर लाभ देण्यात येणार आहे. ही रक्कम थेट पात्र शेतकऱ्यांच्या बचत खात्यामध्ये वर्ग होणार आहे. त्यासाठी वापरात असलेले बँक खाते 5 सप्टेंबरपूर्वी आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचे आधार कार्ड बचत खात्याशी लिंक नाही, त्यांनी तातडीने लिंक करून घ्यावे, असे आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.


योजनेकरिता पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांचे आधार क्रमांक उपलब्ध नसल्यास अशा शेतकरी सभासदांची यादी गटसचिव व संबंधित तालुक्याच्या बँक अधिकारी यांनी तयार करून ती संस्थेचे कार्यालय, ग्रामपंचायत, बँक शाखेच्या ठिकाणी प्रसिध्द करण्यात येणार आहे. 


आधार क्रमांक नसणाऱ्या शेतकऱ्यांनी आधार क्रमांक काढून तो बँक खात्यास लिंक करावा. सन 2019 मध्ये आलेल्या महापुरात बाधित झाल्यामुळे कर्जमाफीचा लाभ मिळालेला शेतकरी देखील या योजनेकरिता पात्र आहे, अशी माहिती सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक अमर शिंदे यांनी दिली आहे.


दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात एकूण 1 लाख 72 हजार शेतकरी या अनुदासाठी पात्र होणार आहेत. याची अंदाजे रक्कम 550 कोटीपर्यंत जाईल असा अंदाज अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.


इतर महत्वाच्या बातम्या