Ambabai Mandir Navratri : विजयादशमीला करवीर निवासिनी अंबाबाईची रथारूढ रूपात अलंकार पूजा बांधण्यात आली. गजानन मुनीश्वर आणि मुकुल मुनीश्वर यांनी ही पूजा बांधली. प्रत्येक जीव स्वतःच्या अशा काही मर्यादा घालून घेत असतो. प्रयत्न केला, तर त्या मर्यादा ओलांडून प्रगतीचे नवे शिखर साध्य करता येते, याचा संदेश देणारा उत्सव म्हणजे विजया दशमी. सीमोल्लंघनाची इच्छा प्रत्येकाची असते, पण त्यासाठी योग्य दिशा आणि पाठिंब्याची गरज असते. 


बंधन झुगारण्यासाठी एका समर्थ शक्तीची आवश्यकता असते. ती शक्ती म्हणजे विजयाची शाश्वती आणि असा नित्य शाश्वत विजय जिला शक्य आहे अशी एकमेव शक्ती म्हणजे जगदंबा. भक्त भाविकांना मार्ग दाखवण्यासाठी स्वतः असीम महालक्ष्मी रथारूढ होऊन आज शिलंगणासाठी सजली आहे. जगदंबा नारायणीचा हात धरून आपण ही आपण आखलेल्या आपल्या भोवतालची खुरटी कुंपण ओलांडून पुढे जाऊ आणि जगद्व्यापक जगदंबेची अखंड कृपा अनुभवू. 


करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी 


कोल्हापूर शाही दसरा महोत्सव यंदा राज्य सरकारच्या सहभागाने भव्य स्वरुपात साजरा होत आहे. या पार्श्वभूमीवर करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली. 


अंबाबाई मंदिरात भक्तीचा महापूर, 23 लाखांवर भाविकांनी घेतले दर्शन 


दुसरीकडे तब्बल दोन वर्षांनी निर्बंधमुक्त झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवामध्ये करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरात गर्दीचे आजवरचे विक्रम मोडित निघाले आहेत. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती तसेच जिल्हा  प्रशासनाकडून शारदीय नवरात्रोत्सवामध्ये 25 लाखांवर भाविक मंदिरात दर्शनासाठी येतील अशा अंदाजाने नियोजन केले होते. प्रत्यक्षात अंबाबाई मंदिरात नवरात्रीमध्ये 23 लाख 31 हजार 604 भाविकांनी भेट दिली.


देवस्थान समितीकडून ऑनलाईन दर्शनाची सुद्धा सोय करण्यात आली होती. या माध्यमातून 42 लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले. दुसरीकडे सप्तमीला अंबाबाई मंदिरात देवस्थान समितीकडून 7 लाख 73 हजार 721 भाविकांनी दर्शन घेतल्याचा दावा करण्यात आला. तथापि, या आकड्यावरून मत मतांतरे आहेत. कारण तीन लाखांवर भाविक गेल्यानंतर कोल्हापूरमध्ये करण्यात आलेली 12 ठिकाणची पार्किंग व्यवस्था कोलमडली होती. शहरातील वाहतुकीवरही ताण निर्माण झाला होता. त्यामुळे त्या दिवशीच्या आकडेवारीबाबत साशंकता आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या