Almatti Dam Height : कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणाची उंची 519 वरुन 524 फुटांपर्यंत वाढवण्याची घोषणा केल्याने शिरोळ तालुक्यातील पुरबाधितगावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या उंची वाढवण्यावरून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. धरणाची उंची वाढण्यासाठी कर्नाटक सरकारने लवादाकडून तसेच न्यायालयाकडून तशी मान्यताही घेतल्याचे समजते. उंचीच्या वाढीसाठी वेळोवेळी विरोधही झाला मात्र,याचा विचार शासकीय पातळीवर झाला नसल्याने आता यासाठी जनलढा उभारण्याची गरज आहे. शासनानेही याचा विचार करुन अलमट्टीची उंची वाढल्यास महापुरच्या बॅकवॉटरचा धोका निर्माण होवू शकतो, हे लवादाकडे मांडणे सध्या गरजेचे आहे.


अलमट्टी धरणाची उंची वाढवल्यास कृष्णा नदीपात्राच्या पाण्यात मोठ्या प्रमाणावर फुगवटा निर्माण होऊन कृष्णा नदीकाठावरील गावांचे अस्तित्वच धोक्यात येणार आहे. गावे, शेती पर्यायाने सारे जीवनच उद्धस्त होण्याची भीती आहे. हा संभाव्य धोका टाळण्यासाठी रस्त्यावर उतरण्याशिवाय सध्या गत्यंतर नाही. सांगली कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच कर्नाटक राज्यातील अनेक गावे कायमची संकटात सापडणार आहेत. 2005, 2019, 2021 या सालात अलमट्टी धरण पूर्ण क्षमतेने भरले होते. त्यावेळी आलेल्या महाप्रलंयकारी महापुराचे नुकसान पाहता संपूर्ण शिरोळ तालुक्यासह सांगली - कोल्हापूर जिल्ह्यांतील अनेक गावांचे पुनर्वसन करावे लागले होते. 


महाराष्ट्रातील कोयना, पंचगंगा, कृष्णा, वारणा, दूधगंगा या नद्यांचे पाणी कृष्णेद्वारे अलमट्टीलाच मिळते. अतिवृष्टीत जर तेथे पूर्ण क्षमतेने पाणी अडविले गेले, तर या सर्व नद्यांना पुन्हा महाभयंकर पूर येऊ शकतो. या अगोदरही कर्नाटकचे तत्कालीन मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी अलमट्टीची उंची वाढविण्याचे जाहीर केले होते, मात्र कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व जनतेने रस्त्यावर उतरूनआंदोलन केले. आताही काही संघटना या विरोधात आहेत.


महापुरानंतर संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी वडनेरे समिती नेमण्यातही आली होती. त्यांनी विविध ठिकाणांना भेटी दिल्या, लोकांशी चर्चा केली. त्यांनी कुरुंदवाड येथे सेंट्रल वॉटर कमिशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यात पूर लवकर न ओसरण्यामागे अलमट्टी धरण आणि त्याच्या वरच्या बाजूला कर्नाटकच्या हद्दीत अंकली-मांजरी पुलाचा भराव आणि हिप्परगी धरणाजवळील तांत्रिक अडचणी कारणीभूत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे धरण उंचीच्या वाढीवरून तालुक्यातील नेत्यांनी राजकारण न करता एकसंघ होऊन लढा उभा करण्याची गरज आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या