JharkhandExitPoll: झारखंडमध्ये विधानसभा निवडणुकीमुळे वातावरण गरम आहे. यातच भाजपला झारखंडमध्ये मोठा दणका बसणार असल्याचा अंदाज एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळत नसल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्व्हेमध्ये हा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. झारखंडमध्ये एकूण 81 विधानसभा जागांसाठी पाच टप्प्यात निवडणुका झाल्या होत्या. सत्तेत येण्यासाठी कुठल्याही पक्षाला 41 हा बहुमताचा आकडा पार करावा लागणार आहे. मात्र मागील विधानसभेत 37 जागा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपला या निवडणुकीत मात्र मोठा फटका बसण्याचा अंदाज आहे.
कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार 


भाजप - 32
काँग्रेस+ - 35
झारखंड विकास मोर्चा- 03
ऑल झारखंड स्टुडंट युनियन - 05
इतर - 06
भाजप यावेळी राज्यात एकट्याने मैदानात उतरली आहे. सर्व्हेमध्ये भाजपला 32 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला दहा आणि काँग्रेसच्या सोबत असलेल्या झारखंड मुक्ती मोर्चाला 23 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तसेच या आघाडीमध्येच असलेल्या आरजेडीच्या खात्यात दोन जागा येण्याची शक्यता आहे. राज्यात काँग्रेस, जेएमएम आणि आरजेडी एकत्रित निवडणूक लढत आहेत.
2014 मध्ये कुणी किती जागा जिंकल्या होत्या ?

2014 च्या निवडणुकांमध्ये भाजपने 37 जागा जिंकत  ऑल झारखंड स्टुडन्ट यूनियन (AJSU) सोबत सरकार स्थापन केलं होतं.  AJSU ने पाच जागा जिंकल्या होत्या. तर निवडणुकीनंतर झारखंड विकास मोर्चाच्या आठमधील सहा आमदारांनी भाजपला पाठिंबा दिला होता. तर झारखंड मुक्ती मोर्चा (जेएमएम) 19, काँग्रेस 6 आणि इतर पक्षांनी सहा जागा जिंकल्या होत्या.

2014 च्या तुलनेत भाजपला पाच जागांचे नुकसान होणार असल्याचे चित्र आहे. तर जेव्हीएमला देखील पाच जागांचे नुकसान होणार असल्याचा अंदाज आहे.  AJSU ला मात्र आपल्या पाच जागा मिळतील असा अंदाज आहे. तर मागील वेळी सहा जागा जिंकणाऱ्या काँग्रेसला यावेळी दहा जागा मिळतील असा अंदाज आहे. काँग्रेसला चार आणि जेएमएमला चार जागांचा फायदा होणार असल्याचा अंदाज आहे.
कोणत्या पक्षाला किती टक्के मतं?

भाजप - 37%
काँग्रेस + - 34%
जेव्हीएम - 08%
AJSU- 07%
इतर - 14%
कसा झाला आहे हा सर्व्हे?

या सर्व्हेसाठी झारखंड विधानसभेच्या सर्व  81जागांवर एक्झिट पोल घेण्यात आला होता. या अंतर्गत 405 पोलिंग बूथवर अभ्यास सर्व्हे करण्यात आला होता. या सर्व्हेसाठी जवळपास  37,000 लोकांशी संवाद केला होता.