जालना :  जालना जिल्ह्यातील अंतवरली सराटी गावामध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये रेटारेटी झाली आहे. मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी उपोषण सुरू होते. त्या ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज (Jalna Police LathiCharge) केला. उपोषण करणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार (Firing) केला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे. या घटनेनंतर जिल्ह्यात तणावाची स्थिती आहे. घटनास्थळी दगडांचा खचही असल्याचे दिसून आले आहे. उपोषण आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी केलेल्या कारवाईविरोधात राज्यभरात संताप व्यक्त करण्यात  येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी या लाठी हल्ल्याचा निषेध केला आहे. 


29 ऑगस्टपासून मराठा मोर्चा समन्वयक मनोज जरांगे यांच्यासह 10 जण आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलनाला बसले आहेत. त्यांच्या समर्थनासाठी अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. उपोषणकर्त्या आंदोलकांची प्रकृती खालावण्याची भीती निर्णाम झाली होती. त्यामुळे उपोषण आंदोलन चिघळू नये यासाठी पोलिसांकडून उपोषण करणाऱ्या आंदोलकांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याला आंदोलकांनी विरोध केला. त्यानंतर दोन्ही बाजूने रेटारेटी झाली. पोलिसांनी लाठीचार्ज करण्यात आला. तर, आंदोलकांकडून दगडफेक करण्यात आल्याची माहिती आहे. आक्रमक झालेल्या आंदोलकांना आवरण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केला आणि लाठीचार्ज केला. 


गृह खात्याची अतिरेकी भूमिका निषेधार्ह


जालन्यातील उपोषण आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईविरोधात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी संताप व्यक्त केला. उपोषण थांबावावं असा पोलिसांचा आग्रह होता. आंदोलक आणि पोलिसांमध्ये चर्चा झाली होती. आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. त्यानंतर काही कारण नसताना लाठी हल्ला झाला असल्याची माहिती स्थानिकांनी दिली असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटले. गृह खात्याकडून अशी अतिरेकी भूमिका घेणे चुकीचे आहे. या लाठी हल्ल्याचा आपण निषेध करत असल्याचे पवार यांनी म्हटले. 


मराठा समाजाची सरकारकडून फसवणूक



मराठा आरक्षणाच्या मुद्यावर समाजाची फसवणूक सुरू आहे. 50 टक्क्यांची मर्यादा वाढवल्याशिवाय आरक्षण देता येणार नाही, हे सगळ्यांना माहिती होते. मात्र, ही बाब माहिती असूनही सरकारने खोटं आश्वासन दिले. पोलिसांच्या माध्यमातून आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न झाला असल्याचे राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वड्डेवटीवार यांनी म्हटले. मराठा आरक्षणासाठी आरक्षणाची मर्यादा वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. मराठा समाजाची फसवणूक करणाऱ्यांना मराठा समाज नक्कीच धडा शिकवणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.