Jlana Water Issues: जालना शहरात निर्माण झालेल्या पाणी टंचाईच्या मुद्यावरून आज भाजपकडून जल आक्रोश मोर्चा काढण्यात आला. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली हा भव्य मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी फडणवीस यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. भाजपला उशिरा सुचेलेलं शहाणपण म्हणणाऱ्या अर्जन खोतकर अडीच वर्ष तुम्ही झोपून होता का? असा टोला फडणवीस यांनी लगावला आहे. 


यावेळी बोलताना फडणवीस म्हणाले की, सरकराला समान्य माणसाच्या आक्रोशाची दखल घ्यावी लागेल, जे सरकार सामन्या माणसाच्या आक्रोशाची दखल घेत नाही ते सरकार जागेवर राहत नाही. आमच्या काळात 129 कोटी रुपये जालन्याच्या पाण्यासाठी दिले होते. आता अडीच वर्षे झाले त्या पैश्याच या सरकारने काय केलं असा प्रश्न फडणवीस यांनी यावेळी उपस्थित केला. 


खोतकरांवर हल्लाबोल  


भाजपने जालन्यात काढलेला जल आक्रोश मोर्चा म्हणजे,  उशिरा सुचेलेलं शहाणपण असल्याच शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांनी टीका केली आहे. त्यांच्या टीकेला उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, नाकर्तेपणामुळे जे पाणी देऊ शकले नाही तेच लोकं असा प्रश्न विचारतील, तुम्ही झोपला होता का?,का नाही केलं अडीच वर्षे,का झोपून राहिलात, याचा उत्तर आधी दिले पाहिजे असा टोला फडणवीस यांनी लगावला. 


किमान सरकार जागं झालं...


काही दिवसापूर्वी औरंगाबादमध्ये भाजपकडून काढण्यात आलेल्या जल आक्रोश मोर्च्यामुळे पाण्याच्या समस्येचं निराकरण झालं का? यावर बोलताना फडणवीस म्हणाले, आमच्या मोर्च्यामुळे किमान सरकार सरकार जागं झालं, मुख्यमंत्री यांना यावं लागलं,घोषणा करावी लागली आणि काही काम सुरु झालं. तसेच इथेही करावे लागेल, असेही फडणवीस म्हणाले. 


पोलिसांचा मोठा बंदोबस्त...


फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज काढण्यात आलेल्या मोर्च्यात मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यामुळे पोलिसांकडून सुद्धा खबरदारी म्हणून मोर्च्यास्थळी मोठा बंदोबस्त लावण्यात लावण्यात आला आहे. शहरातील मामा चौक ते गांधी चमनपर्यंत पोलीसांचा बंदोबस्त असल्याचे पाहायला मिळाले. सोबतच मोर्च्याच्या ठिकाणी साध्या वेशात सुद्धा विशेष पोलीस तैनात करण्यात आले होते.