जालना : लोकसभा निवडणुकीच्या (Lok Sabha Election) तारखा जाहीर होताच राजकीय पक्षातील नेत्यांमधील नाराजीनाट्य रंगताना पाहायला मिळत आहे. ठाकरेगटातील खैरे-दानवे नाराजीनाट्याची चर्चा सुरु असतानाच आता मराठवाड्यातील (Marathwada) महत्वाचे नेते आणि शिंदे गटाचे माजी आमदार अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचे समर्थक देखील नाराज असल्याचे समोर येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी थेट पत्रकार परिषेदतच कार्यकर्त्यांची नाराजी बोलून दाखवली असल्याने चर्चेला उधाण आले आहे. तर, “याबात आपण योग्य ठिकाणी आपली नाराजी व्यक्त केली असल्याचे' देखील खोतकर म्हणाले आहेत. 


मागील लोकसभा निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात दंड थोपटले होते. शेवटी वरिष्ठांच्या पुढाकाराने त्यांच्यातील वाद संपला होता. आता पुन्हा एकदा महायुतीकडून रावसाहेब दानवे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अशात अर्जन खोतकर यांनी पत्रकार परिषेद बोलावून कार्यकर्त्यांची नाराजी समोर आणली आहे. "विकास कामांच्या उद्घाटन कार्यक्रमात शिवसेना पदाधिकाऱ्यांची नावे येत नाहीत. त्याबाबत कार्यकत्यांमध्ये नाराजी आहे. माझ्याकडे त्यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे कार्यकत्यांनी व्यक्त केलेली नाराजी योग्य ठिकाणी व्यक्त केल्याची" माहिती माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी दिली. निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्यापूर्वीच खोतकर गटाकडून नाराजी व्यक्त केली जात असल्याने चर्चेला उधाण आले आहे.


मुख्यमंत्री शिंदे यांच्या निर्देशानुसार जिल्ह्यात काम करणार...


मागील निवडणुकीत दानवे-खोतकर वाद चांगलाच गाजला होता. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील भूमिका काय या प्रश्नावर खोतकर म्हणाले की, "आता आमची महायुती आहे. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादीची महायुती आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार आम्ही जिल्ह्यात काम करीत असल्याचेही खोतकर म्हणाले.


विकास कामांच्या मुद्यांवरून नाराजी 


अजुर्न खोतकर आणि रावसाहेब दानवे हे वाद काही नवीन नाही. प्रत्येक लोकसभा निवडणुकीत या वादाची चर्चा असते. मागील निवडणुकीत तर अर्जुन खोतकर यांनी थेट दानवेंच्या विरोधात मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला होता. शेवटी दोनही पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी दोघांमधील वाद मिटवला आणि खोतकर यांनी माघार घेतली. आता पुन्हा दोनही नेत्यांच्या पक्षाची युती आहे. अशात खोतकर यांनी विकास कामांच्या मुद्यांवरून नाराजी व्यक्त केल्याने चर्चेला उधाण आले आहे. 


यापूर्वी देखील नाराजी व्यक्त केली होती...


विशेष म्हणजे मागील काही दिवसांपूर्वी देखील खोतकर यांनी निधी वाटपावरून आपली नाराजी व्यक्त केली होती. जालना जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे शिंदे गटाच्या नेत्यांना निधी वाटप करतांना डावलत असल्याचा आरोप करत खोतकरांच्या समर्थकांनी सावेंना जाब विचारला होता. त्यावेळी खोतकर यांनी देखील नाराजी व्यक्त करत सत्तेत सोबत असल्याने योग्य न्याय दिला पाहिजे असे म्हटले होते. आता पुन्हा एकदा त्यांच्या कार्यकर्त्यांची नाराजी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर समोर आल्याने वेगवेगळ्या चर्चा रंगत आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या : 


मोठी बातमी : वाद विकोपाला जाताच उद्धव ठाकरेंनी दानवे-खैरेंना मातोश्रीवर बोलावले; उमेदवारी कुणाला मिळणार?