जालना:  अंतरवली सराटी (Antarwali Sarathi Lathicharge)  येथील उपोषण स्थळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये (Jalna Police) झालेल्या राड्यानंतर लाठीचार्ज आणि दगडफेकीची घटना घडली. या दगडफेकीच्या घटनेतील प्रथम आरोपी ऋषिकेश बेदरेला जालन्यातील अंबड  पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. आरोपी बेदरे कडून एक गावठी पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आलं आहे. अंतरवाली सराटीच्या घटनेनंतर ऋषिकेश बेदरेवर गोंदी पोलीस ठाण्यात कट रचून जीवे मारण्याच्या उद्देशाने दगडफेक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचा शोध घेत असताना तो इतर 2 साथीदारांसह आढळून आला. 


जालन्यातील अंतरवली सराटीमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये झालेल्या राड्यानंतर झालेल्या दगडफेकीच्या घटनेतील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. एका आरोपीकडे पोलिसांकडून गावठी पिस्टल आणि दोन जिवंत काडतुस आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मराठा आंदोलकांवर (Maratha Reservation Protest) झालेल्या लाठीचार्जचे आदेश राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले नसल्याचं माहिती अधिकारातून समोर आलं आहे. जालन्याचे पोलीस उपाधीक्षक आर सी शेख यांनी ही माहिती दिली आहे. 


पोलिसांच्या लाठीचार्जनंतर दगडफेक


माहिती अधिकार कार्यकर्ते आसाराम डोंगरे यांनी जालन्यातील लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते याची माहिती मागवली होती. त्यावर जालन्याचे पोलीस उपअधिक्षक आर सी शेख यांनी माहिती दिली. आंदोलनकर्त्यांवर लाठीचार्ज करण्यासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून आदेश नाहीत असं त्यात म्हटलं आहे. जालना (Jalna) जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) सुरु असलेल्या उपोषणस्थळी  पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला गेला. पोलिसांच्या लाठीचार्जनंतर त्यावेळी जोरदार दगडफेक करण्यात आली होती.


फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले


जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीचार्जचे आदेश कुणी दिले होते असा विरोधकांनी प्रश्न केला होता. या घटनेनंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिलगिरी व्यक्त केली आणि तसा आदेश गृहमंत्रालयाकडून दिला गेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं होतं. तरीही जालन्यातील घटनेवरून फडणवीसांवर अनेकांनी आरोप केले होते. 


राज्यभर  पडसाद उमटले


पोलिसांनी कायदा सुव्यस्था राखण्याच्या आणि तब्येत खालावत असल्याच्या दृष्टीने, उपोषण मागे घेण्याची विनंती केली. तीन वेळा पोलीस आणि ग्रामस्थ चर्चा झाल आणि पावणेसहा वाजता उपोषणाच्या व्यासपीठा समोर बसलेल्या आंदोलक आणि पोलीस समोरासमोर आले आणि एकच गोंधळ सुरू झाला. हा गोंधळ पांगवण्यासाठी पोलिसांनी पावणेसहा वाजता लाठीमार केला. संतप्त गावकरी आणि आंदोलकांनी दगडफेक सुरू केली, या घटनेत शेकडो आंदोलक आणि 45 पोलीस जखमी झाले होतेआणी त्याच रात्री अनेक भागात जाळपोळ झाली. राज्यभर याचे पडसाद उमटले.