जळगाव : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांच्या मागणीवर माझ्याकडे उपाय आहे, मात्र आताच्या या चोरांसमोर मांडलं तर हे त्याचं खोबरं करतील त्यामुळे मी ते मांडणार नाही असं वक्तव्य वंचितचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केलं. नवीन सत्ताधारी येऊ द्या त्यानंतर त्यांना सांगता येईल की आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा कसा हाताळायचा आणि तो हँडल करत असताना ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता कसा हाताळायचा हे मी त्यांना सांगेन परंतु आताच्या सत्ताधाऱ्यांना सांगणार नसल्याचे प्रतिक्रिया प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.


गिरीश महाजन यांनी एका प्रश्नाचे उत्तर द्यावं की अॅड. जनरल कुंभकोणी यांनी यशस्वीरित्या मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भात खटला लढवला. मात्र त्यांच्या सरकारने कुंभकोणी यांना पुढे परत काम का करू दिले नाही? त्या केस मध्ये लक्ष घालू नका, हजर राहू नका हे आदेश का दिले. हे महाजन यांनी सांगितलं पाहिजे. याचे उत्तर महाजन यांनी द्यावं म्हणजे त्यांच्या दीर्घकालीन आरक्षणाच्या सांगण्यावर विश्वास ठेवता येईल असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर टीका केली आहे.


सध्याचं अधिवेशन म्हणजे लोकशाहीतील तमाशा 


नागपूरमध्ये अधिवेशन सुरू आहे असं वाटत नाही, विरोधी पक्ष कोण आणि सत्ताधारी पक्ष कोण हेच समजत नाही. जे सत्ताधारी पक्षांनी मांडलं पाहिजे ते विरोधी पक्ष मांडत आहे आणि जे विरोधी पक्षाने मांडलं पाहिजे ते सत्ताधारी पक्ष मांडतो आहे. असा लोकशाहीमधील तमाशा विधिमंडळात सुरू आहे. अनेक ज्वलंत प्रश्न आहेत पण त्याची चर्चा सभागृहामध्ये होत नाही. सगळ्यात महत्त्वाचं आहे की क्रॉप इन्शुरन्सबद्दल अजूनही ठोस निर्णय घेण्यात आला नाही.


काँग्रेसने भाजपवर आरोप केला आहे की, भाजपला बहुमत सिद्ध करता येत नाही म्हणून पक्ष फोडीचे राजकारण करते. मात्र काँग्रेसने देखील असेच केले आहे. काँग्रेसने आमच्या सोबत देखील असेच केले होते, आम्ही त्याचे भोगी आहोत. काँग्रेसने जे केलं तेच बीजेपी करते आहे अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस पक्षावर केली आहे . 


जळगाव लोकसभेचा निर्णय आघाडीवर अवलंबून


जळगाव लोकसभेच्या निवडणुकीविषयी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, अगोदर आघाडी ठरली, आघाडी होते की नाही होते ते बघावं लागेल. आघाडी जर होणार असेल तर आघाडीचा जो निर्णय असेल तो मान्य करावा लागेल. आघाडी जर होणार नसेल तर वेगळी परिस्थिती निर्माण झाली तर त्या परिस्थितीनुसार आम्ही भूमिका घेऊ.


नरेंद्र मोदी हे देशासाठी मोठा धोका


व्यक्ती म्हणून जर तुम्ही मला विचारलं तर नरेंद्र मोदी हे देशाला एक प्रचंड मोठा धोका आहे. मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांच्या मागील एक वर्षात कितीदा भेट झाली हे आधी मोहन भागवत यांनी जाहीर करावं. कुठे झाली हेही त्यांनी जाहीर करावं. ज्या आर एस एस च्या जोरावरती नरेंद्र मोदी मुख्यमंत्री झाले आणि मुख्यमंत्री वरून पंतप्रधानपदावर गेले त्या संघटनेचे तीन तेरा वाजवण्याचे नरेंद्र मोदी यांनी ठरवलं असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.


मुख्यमंत्री होणार का?


बच्च कडू यांना एवढं सांगेन की, त्यांच्या हातात असतं तर त्यांनी मला मुख्यमंत्री केलं असतं. पण मुख्यमंत्री होणार हे त्यांच्या हातात नाही जनतेच्या हातात आहे. जनता ज्याला मुख्यमंत्री करेल त्याला आपण स्वीकारलं पाहिजे


मनमोहन सिंग पंतप्रधान असताना एक फार मोठा तमाशा सुरू होता. एका बाजूने पाकिस्तान आणि एका बाजूने मनमोहन सिंग त्याची पुनरावृत्ती सध्या महाराष्ट्रात सुरू आहे. असं म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील आणि भुजबळ यांच्यात सुरू असलेल्या वाक् युद्धावर प्रतिक्रिया दिली आहे.


इंडिया आघाडी संदर्भात बैठक होणार आहे, मात्र अजून त्याचे निमंत्रण नाही. त्यामुळे त्यात चर्चा काय होणार? आम्हाला निमंत्रण आले तर बैठकीला जाणार असल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले असून उद्धव ठाकरेंसोबत युती ही वर्षापूर्वी झालेले आहे आणि आम्ही एकत्र निवडणुक लढू हे ठरले आहे


ही बातमी वाचा :