जळगाव : 'मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. पण माझ्या विरुद्ध कितीही चौकशा लावा आणि कितीही खोदा काहीच मिळणार नाही, असा टोला राष्ट्रवादीचे (NCP)  नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी भाजपला लगावला आहे.

  


जळगाव (Jalgaon News Update) येथील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना एकनाथ खडसे यांनी भाजपवर निशाणा साधला. ते म्हणाले, " कितीही खोदा, मात्र काही मिळणार नाही, सरळ लढू शकत नाही, त्यामुळे अशा पध्दतीने बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी जेलमध्ये जाणार असल्याच्या तारखा दिल्या जात आहेत. आता सीबीआय चौकशी सुरू केली आहे. सगळ्या चौकशा लावल्या आहेत, जर काही केले नसेल तर घाबरण्याचं कारण नाही. मी एक रुपयाचा देखील भ्रष्टाचार केला नाही, केवळ बदनाम करण्याचा प्रयत्न आहे.   


एकनाथ खडसे म्हणाले, "कार्यकर्ते आणि नेते जोपर्यंत एकत्र येत नाहीत तोपर्यंत संघटना मजबूत होत नाही. पाया मजबूत झाला तर निवडणुकांमध्ये यश मिळेल. यावेळी एकनाथ खडसे यांनी त्यांच्या कन्या रोहिणी खडसे यांच्या संवाद यात्रेचा उद्देश देखील स्पष्ट केला. तसेच गटबाजीवरही खडसेंनी भाष्य करत जिल्हाध्यक्ष बदलावा किंवा नाही यावर मी बोलणार नाही, असे सांगितले.  


सर्वांचं समाधान करणारा माणूस जन्माला आलेला नाही असे म्हणत खडसे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. सरकार असताना अनेकदा त्यांची भेट घेतली मात्र न्याय मिळाला नाही असेही खडसे यावेळी म्हणाले. 


"माणसं खोक्यावर निवडून येतात यावर विश्वास नाही. तसेच विकासकामांवर निवडून येतात यावरही माझा विश्वास नाही. मी निवडून आलो का?  असा प्रश्न उपस्थित करत परत मला उभ राहायचं आहे असं नाही असा भावना खडेसे यांनी यावेळी व्यक्त केल्या.  


मला पक्षाचा आढावा घेण्याचे अधिकार पक्षाने द्यावे, असे म्हणत एकनाथ खडसे यांनी जे काम करत नसतील त्यांना काढून टाकले पाहिजे असेही स्पष्ट केलं. किती दिवस शरद पवार यांच्या नावावर निवडून येणारं आणि जिंकणार या शब्दात खडसेंनी उपस्थितांचे कान टोचले. विकास कामाची स्पर्धा असावी, असे सांगत मंत्री असताना अल्पसंख्यांक विभागासाठी मोठं काम केलं असल्याचंही यावेळी खडसे म्हणाले.