Jalgaon News: जळगाव : जळगावातील (Jalgaon News) कमळगाव इथं आठवडी बाजारात पाणीपुरी खाल्ल्यानं 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्याची बाब समोर आली आहे. विषवाधा झालेल्यांवर पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेबाबत माहिती मिळताच आरोग्य अधिकारी पथकासह रुग्णालयात पोहोचताच, उपचारांना गती मिळाली. 


जळगावात पाणीपुरी खाल्ल्यानं 80 पेक्षा अधिक जणांना विषबाधा झाल्यानं पुरती खळबळ माजली आहे. पिंप्री, चांदसणी, कमळगाव येथील रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कमळगाव आणि आजूबाजूच्या खेड्यांतील तसेच चांदसणी, मितावली, पिंप्री येथील ग्रामस्थ बाजारासाठी आले असताना तेथील पाणीपुरी विक्रेत्यांकडून अनेकांनी पाणीपुरी खाल्ली. तर काहींनी पाणीपुरी पार्सल घरी घेऊन गेले होते. मात्र, ही पाणीपुरी खाल्ल्यानं सर्वांनाच मनस्ताप सहन करावा लागला आहे. 


मंगळवारी सकाळी उलट्या, जुलाब, पोटात दुखणं या समस्या जवळपास पाणीपुरी खाल्लेल्या सर्वांना उद्भवल्या. मोठ्या प्रमाणावर त्रास जाणवू लागल्यानंतर सर्वांनी रुग्णालयाचा रस्ता धरला. यापैकी अनेक रुग्णांनी खासगी रुग्णालयात उपचार घेतले. परंतु, संध्याकाळी 6 वाजल्यानंतर अचानक रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली. घटना समजल्यानंतर चोपडा तालुका गटविकास अधिकारी रमेश वाघ तसेच आरोग्य अधिकारी डॉ. प्रदीप लासुरकर हे आरोग्य पथकांसह दाखल झाल्यावर उपचारास गती मिळाली. अडावद आरोग्य केंद्रात रुग्णसंख्येत वाढ होताच गावातील ग्रामस्थांनी मदत कार्यासाठी धाव घेतली. 


30 रुग्ण उपजिल्हा रुग्णालयात दाखल 


अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रासह अडावद व चोपडा येथील खासगी रुग्णालयांतही अन्नामुळे विषबाधा झालेल्या रुग्णांची संख्या वाढतच गेली. यापैकी डिंपल कोळी (16), आयर्न सपकाळे (7), पवन सोनवणे (13), निकिता कोळी (13), चेतना सपकाळे (19) यांच्यासह 30 जणांना उपजिल्हा रुग्णालय चोपडा येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. पाणीपुरीमुळे त्रास झाल्याबाबत सोमनाथ जगन कोळी (रा. पिंप्री) यांनी पोलिस स्टेशनला लेखी जबाब दिला आहे. अडावद येथे सायंकाळनंतर अडावद प्राथमिक आरोग्य केंद्रात पिंप्री, कमळगाव येथील विषबाधा झालेले सर्वच वयोगटातील रुग्ण वाढतच गेले. या ठिकाणाहून 70 पैकी 30 रुग्ण चोपडा येथे उपजिल्हा रुग्णालयात व इतर रुग्ण खासगी व जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले. रात्री सुमारे 10 रुग्णांवर अडावद येथे उपचार सुरू होते.