Jalgaon News जळगाव : जळगाव जिल्ह्यात दिवस-रात्र सुरू असलेल्या अवैध रेती वाहतुकीवर अद्यापही प्रभावी नियंत्रण मिळवले गेलेले नाही. महसूल मंत्र्यांनी अवैध रेती वाहतुकीविरोधात जाहीर केलेल्या धोरणांची अंमलबजावणी प्रशासन स्तरावर अडकून पडली आहे. शासन स्तरावरून अवैध रेती उत्खनन आणि वाहतुकीवर अनेक कारवाया केल्या जात असल्याचे सांगितले जात असले तरी, जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर रेती माफियांची मुजोरी सुरू आहे.


सर्वच तालुक्यांत खुलेआम अवैध वाहतूक


जळगाव जिल्ह्यात असा एकही तालुका नाही, जिथे अवैध रेती वाहतूक सुरू नाही. दिवस-रात्र रेती वाहतूक सुरू असल्याने रेती माफियांचे जिल्ह्यात बळकट जाळे तयार झाले आहे. महसूल विभागाने मागील वर्षभरात सहाशेहून अधिक घटनांमध्ये कारवाई करत तब्बल चार कोटी रुपयांहून अधिक दंडाची रक्कम वसूल केली आहे. मात्र, यानंतरही अवैध वाहतूक सुरूच असल्याचे दिसून येत आहे.


महसूल अधिकाऱ्यांवर हल्ल्याचे प्रकार वाढले-


अवैध रेती वाहतूक करताना महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांवर जीवघेणे हल्ले करण्याच्या सात घटना घडल्या आहेत. या हल्ल्यांमध्ये तलाठी, मंडळ अधिकारी आणि निवासी जिल्हाधिकाऱ्यांवरही प्राणघातक हल्ले झाले आहेत. महसूल विभागाच्या कारवाईला जाणीवपूर्वक विरोध करत माफियांनी प्रशासनावर दहशतीचे वातावरण निर्माण केले आहे.


अपघात आणि शेतकऱ्यांचे नुकसान-


रेती वाहतूक करणाऱ्या डंपरच्या धडकेत आतापर्यंत आठ ते दहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. अवैध रेती वाहतूक करताना शेतकऱ्यांच्या शेतात घुसून उभी पिके तुडवली जात आहेत. तसेच, शेतकऱ्यांना धमक्या देऊन दहशत माजवली जात असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष आहे.


तत्काळ कठोर कारवाईची मागणी-


जळगाव जिल्ह्यातील नागरिक आणि शेतकऱ्यांनी अवैध रेती वाहतुकीवर तातडीने कठोर कारवाईची मागणी केली आहे. महसूल विभागावर हल्ले होण्याच्या घटना लक्षात घेता, अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्याचीही मागणी होत आहे. प्रशासनाने रेती माफियांवर कठोर कारवाई करून अवैध रेती वाहतूक थांबवावी, अशी नागरिकांची मागणी आहे.


संबंधित बातमी:


मोठी बातमी : महाराष्ट्राला एकाचवेळी दोन मोठे खजिने सापडले, पालघर, सिंधुदुर्गात भलेमोटे तेलसाठे मिळाले!