लखनौ : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील कॅबिनेट मंत्रीच सरकारच्या कामकाजावर नाराज आहेत. कॅबिनेट मंत्री ओमप्रकाश राजभर यांनी 4 जुलैपासून सरकारविरोधात धरणं आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.


ओमप्रकाश राजभर भाजपचा मित्रपक्ष भारतीय समाज पार्टीचे अध्यक्ष आहेत. कुटुंबातील एखादा सदस्य ऐकत नसेल तर त्यासाठी काही तरी करावंच लागतं. समाजवादी पार्टीच्या काळातील अधिकारी आमचं ऐकत नाहीत. जनतेने आम्हाला त्यांना न्याय देण्यासाठी आणि भ्रष्टाचाराविरोधात लढण्यासाठी मत दिलं आहे. सरकारविरोधात नव्हे, तर जिल्हाधिकाऱ्याविरोधात आंदोलन करणार असल्याचं ओमप्रकाश राजभर यांनी सांगितलं.

सरकारमध्ये तुम्हाला डावललं जातंय का, असा सवालही ओमप्रकाश राजभर यांना करण्यात आला. आम्हाला डावललं जात नाही, तर त्या जनतेला डावललं जातंय, ज्यांनी आम्हाला मत दिलं आहे. आमचं काहीही ऐकत नसलेल्या अधिकाऱ्याला बळ कोण देत आहे, हे लवकरात लवकर समोर आलं पाहिजे, अशी मागणी ओमप्रकाश राजभर यांनी केली.

ओमप्रकाश राजभर योगी सरकारमध्ये मागासवर्गीय कल्याण मंत्री आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी जहुराबाद मतदारसंघातून बसपा उमेदवाराचा पराभव केला आहे.