लखनऊ: काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होणं आवश्यक आहे, असं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ यांनी म्हटलं आहे. ते एबीपी न्यूजच्या ‘शिखर सम्मेलन’ या कार्यक्रमात बोलत होते.


यावेळी योगी आदित्यनाथ यांनी गुजरातमध्ये भाजप 150 पेक्षा जास्त जागा जिंकेल, असा विश्वास व्यक्त केला.

आदित्यनाथ म्हणाले, “सध्या राहुल गांधी गुजरातच्या मंदिरांमध्ये भटकत आहेत. मात्र मला आनंद आहे, त्यामुळे त्यांची बुद्धी शुद्ध होत आहे. मात्र त्यांच्याच काँग्रेसने सुप्रीम कोर्टात शपथपत्र दाखल करत, राम-कृष्ण हे सर्व काल्पनिक असल्याचं म्हटलं होतं. त्यामुळे आता राहुल गांधी मंदिरात का येत आहेत?”

राहुल गांधींना मंदिरात बसताही येत नाही, एका मंदिरात असे बसले, जसे ते नमाज पठण करत आहेत, असंही योगी म्हणाले.

राहुल गांधींना शुभेच्छा

राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष बनणार आहेत, त्याबाबत  योगी आदित्यनाथ यांची प्रतिक्रिया विचारण्यात आली. त्याबाबत योगी म्हणाले, "राहुल गांधींना शुभेच्छा. काँग्रेसमुक्त भारतासाठी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष बनणे आवश्यक आहे”

 दरम्यान, राहुल गांधींना अध्यक्ष करण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकारी समितीची बैठक सुरु आहे. गुजरात निवडणुकीपूर्वीच राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

गुजरात निवडणुकीआधीच राहुल गांधी काँग्रेसच्या अध्यक्षपदी?

गुजरात : सोनिया गांधी, मनमोहन सिंह यांच्यासह दिग्गज प्रचारासाठी मैदानात