Wrestlers Protest:  भारतीय कुस्ती महासंघाचे मावळते अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात मागील महिनाभरापासून कुस्तीपटू आंदोलन (Wrestlers protest ) करत आहेत. या आंदोलनाला पाठिंबा वाढत असून आज सलग दुसऱ्या दिवशी कुरुक्षेत्रमध्ये खाप महापंचायत (Khap Mahapanchayat) पार पडली. महापंचायत झाल्यानंतर शेतकरी नेते राकेश टिकेत (Rakesh Tikait) यांनी सरकारला अल्टिमेटम दिला आहे. 9 जूनपर्यंत बृजभूषण सिंहला (Brij Bhushan Singh) अटक करण्याची मागणी त्यांनी केली. त्यानंतर जे काही होईल त्याची जबाबदारी सरकारवर असेल, असा इशाराही त्यांनी दिला. 


याआधी गुरुवारी एक जून रोजी उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगरमध्ये महापंचायत पार पडली होती. मात्र, यामध्ये कोणताही प्रस्ताव मंजूर करण्यात आला नाही. आज, शुक्रवारी 2 जून रोजी, महापंचायत पार पडल्यानंतर राकेश टिकेत यांनी म्हटले की, बृजभूषण सिंहला अटक करावी यावर आम्ही ठाम आहोत. आम्ही 9 जूननंतर कुस्तीपटूंना पुन्हा जंतर-मंतरवर सोडून येऊ आणि देशभरात पंचायत आयोजित करू असे त्यांनी म्हटले. पार पडलेल्या दोन्ही महापंचायतीमध्ये पंजाब, हरयाणा, राजस्थान आणि दिल्लीतील खाप पंचायतींच्या प्रमुखांनी सहभाग घेतला. 


पुढे काय करणार?


राकेश टिकेत यांनी म्हटले की, कुस्तीपटूंना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात आम्ही खाप पंचायत आयोजित करणार आहोत. शामली मध्ये 11 जून आणि हरिद्वारमध्ये 15 ते 18 जूनपर्यंत पंचायत आयोजित करण्यात येणार आहे. कुस्तीपटूंच्या आंदोलनात कोणताही मध्यममार्ग आम्हाला मान्य नाही. बृजभूषण सिंहच्या अटकेच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत. महिला कुस्तीपटूंना न्याय न मिळाल्यास 9 जून पासून आम्ही आंदोलन आमच्या पद्धतीने सुरू करू असेही त्यांनी म्हटले. 


आतापर्यंत काय झाले?


शेतकरी राकेश टिकेत यांनी शुक्रवारी सरकारवर हल्लाबोल करताना म्हटले की, लोकांमध्ये धर्म आणि जातीच्या नावावर फूट पाडली जात आहे. खापपंचायतीच्या दबावामुळे बृजभूषण सिंह यांनी अयोध्येत होणारी त्यांची रॅली रद्द केली असल्याचा दावा टिकेत यांनी केला. असाच दबाव येत्या काळात कायम ठेवला पाहिजे. येत्या काही दिवसात कारवाईची कोणतीही चिन्ह दिसून न आल्यास गावा-गावात धरणे आंदोलन करणार असल्याचे टिकेत यांनी म्हटले. 


खेळाडूंची मागणी काय?


आंदोलक कुस्तीपटू विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया हे गेल्या अनेक दिवसांपासून बृजभूषण सिंह यांच्या विरोधात निदर्शने करत आहेत. बृजभूषण सिंह यांना लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक करण्याची मागणी करत आहेत. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनावेळी खेळाडू संसदेच्या दिशेने कूच करण्याचा प्रयत्न करत होते. मात्र त्यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी आंदोलक कुस्तीपटू आणि पोलिसांमध्ये झटापट झाली. त्यानंतर कुस्तीपटूंनी आपली पदके गंगा नदीत विसर्जित करण्याची घोषणा केली. गंगा नदीकडे कूच करत असताना शेतकरी नेते नरेश टिकेत यांनी या कुस्तीपटूंची भेट त्यांची समजूत काढली. त्यानंतर आता या आंदोलनात खापपंचायत सक्रीय झाली असल्याची चर्चा आहे.