नवी दिल्ली : तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही, पण राजधानी दिल्लीतल्या जंतरमंतरवरती एक 40 वर्षीय महिला चक्क पंतप्रधान मोदींनी आपल्याशी विवाह करावा, या मागणीसाठी उपोषणाला बसली आहे. ओम शांती शर्मा असं आपलं नाव असल्याचं ही महिला सांगते.


8 सप्टेंबरपासून ती जंतरमंतरवर या एका मागणीसाठी उपोषण करते आहे. मोदींचा भलामोठा फोटो सोबत घेऊन तिचं हे आंदोलन सुरु आहे. तिची ही विचित्र मागणी ऐकून लोक तिला वेड्यात काढतात. पण आपली मानसिक स्थिती एकदम ठीक असल्याचा दावा ती करतेय.

देशात एवढी लोकसंख्या असताना केवळ पंतप्रधानांशीच का लग्न करायचंय असा प्रश्न विचारल्यावर ही महिला म्हणते, “माझ्यासाठी ते श्रीराम आहेत. मला माझ्या स्वप्नांत हा साक्षात्कार झाला. मला संपत्ती मिळवण्यासाठी त्यांच्याशी लग्न करायचं नाहीय. केवळ त्यांची सेवा करण्याची संधी मिळावी यासाठीच मी ही मागणी करतेय.”

दिल्लीतल्या जंतरमंतरवर सध्या या महिलेनं तळ ठोकला आहे. आंदोलनाचं कारण अतिशय विचित्र असलं तरी आपल्याला त्यासाठी रीतसर पोलीस परवानगी मिळाल्याचंही ती सांगते.

ओम शांती ही मूळची राजस्थानातल्या जयपूरची आहे. आपण एका मध्यमवर्गीय कुटुंबातून असल्याचं ती सांगते. तिचा विवाह राजस्थानमधल्याच एका व्यक्तीशी झाला होता, पण काही दिवसांतच नवऱ्यानं तिला सोडल्यानं अनेक वर्षांपासून ती माहेरीच राहतेय.

आपलं हे आंदोलन टिकवून ठेवण्यासाठी ती सगळं सामान घेऊन दिल्लीत पोहचलीय. पोट भरण्यासाठी जंतरमंतरजवळच्या गुरुद्वाराचा ती आसरा घेते, तर कपडे बदलण्यासाठी सार्वजनिक स्वच्छतागृहाचा.

दिल्लीतलं जंतरमंतर हे संसदेपासून अवघ्या काही किमी अंतरावर असलेलं ठिकाण हे लोकशाहीचं एका वेगळ्या अर्थानं प्रतिक आहे. इथे रोज हरप्रकारची आंदोलनं पाहायला मिळतात. काही आंदोलनं एका दिवसात पांगतात, तर काही वर्षानुवर्षे डेरा टाकून आहेत. अशा जंतरमंतरवर सध्या या महिलेच्या अतर्क्य अशा आंदोलनाचीच चर्चा आहे.