नवी दिल्ली: दहा महापालिका,जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक निकालानंतर ईव्हीएम अर्थात इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनवर आक्षेप घेतले जाऊ लागले. उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निकालानंतर ईव्हीएमविरोधातील आवाज आणखी वाढला आहे.


मात्र ईव्हीएमसोबत कोणतीही छेडछाड होऊ शकत नाही, असा दावा निवडणूक आयोगाने केला आहे.

ईव्हीएममध्ये छेडछाड का केली जाऊ शकत नाही? त्याची कारणं

1) ईव्हीएममध्ये इंटरनेटचं कोणतंही कनेक्शन नाही. त्यामुळे ते ऑनलाईन हॅक करता येत नाही.

2) कोणत्या बूथवर कोणतं ईव्हीएम जाईल, हे ठरलेलं नसतं. अर्थात सर्व ईव्हीएम हे आधी लोकसभानिहाय, मग विधानसभानिहाय आणि मग सर्वात शेवटी बूथनिहाय ठरवलं जातं. मग पोलिंग पार्टीला एक दिवस आधी, ज्यावेळी मशिन्स पाठवत असतात, त्यावेळीच  समजत की त्यांच्याकडे कोणत्या सीरिजचं ईव्हीएम असेल.

त्यामुळे पोलिंग पार्टीला आपल्याकडे कोणतं ईव्हीएम येईल हे शेवटपर्यंत समजू शकत नाही.

www.abpmajha.in

3) साधारणत: ईव्हीएममध्ये बॅलेट युनिट आणि कंट्रोल युनिट अशी दोन मशिन्स असतात. सध्या त्यामध्ये तीसरं वीवीपीएटी युनिटही जोडलं आहे. यामुळे आपण कोणाला मतदान केलं हे सात सेकंदपर्यंत मतदाराला कळतं. त्यामुळे आपलं मतदान बरोबर झालंय की नाही हे स्वत:ला त्याचवेळी समजतं.

4) मतदानापूर्वी सर्व ईव्हीएमची गोपनीय तपासणी होते. संपूर्ण तपासणी झाल्यानंतरच हे मशीन मतदानासाठी पाठवले जातात.

www.abpmajha.in

5) सर्वात महत्त्वाचं म्हणजे, प्रत्यक्ष मतदानादिवशी सर्वात आधी पोलिंग एजंटना प्रत्यक्ष किंवा मॉक मतदान करण्यास सांगितलं जातं. त्यावरुन मतदान नीट, योग्य होतं की नाही हे तिथंच समजतं. जर काही तांत्रिक चूक असेल, तर सुरुवातीलाच लक्षात येते.

6) पोलिंग एजंट्सच्या मतदानानंतर, पोलिंग पार्टीला ईव्हीएम योग्य असल्याचं प्रमाणपत्र दिलं जातं. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होते.

त्यामुळे मतदान यंत्रात छेडछाडीचा आरोप करणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या पोलिंग एजंटकडून माहिती घ्यावी.

www.abpmajha.in

7) एकदा मतदान सुरु झाल्यानंतर, जोपर्यंत ईव्हीएमची बॅटरी डाऊन होत नाही किंवा काही तांत्रिक बिघाडाशिवाय निवडणूक अधिकारी/कर्मचारी ईव्हीएमजवळ जाऊ शकत नाहीत. मतदारांना प्रश्न असेल, आक्षेप असेल तर ते ईव्हीएमजवळ जाऊ शकतात.

प्रत्येक मतदान केंद्रावर एक रजिस्टर असतं. या रजिस्टरमध्ये मतदान करणाऱ्या मतदारांची माहिती असते. ज्या मतदारांनी मतदान केलं, तेवढ्याच मतदारांची नोंद ईव्हीएममध्ये होते.

मतमोजणीदिवशी ही संख्या केंद्र प्रभारीच्या रिपोर्टवर आधारित असते.
8) यापूर्वी सुप्रीम कोर्टातही ईव्हीएम छेडछाडीबद्दल अनेक तक्रारी आल्या होत्या. मात्र त्यापैकी एकही सिद्ध होऊ शकली नाही. इतकंच नाही तर स्वत: निवडणूक आयोगानेही ईव्हीएममध्ये बिघाड करुन दाखवा, असं आव्हान सामन्य नागरिकांनाही दिलं आहे. मात्र अद्याप कोणीही ईव्हीएम छेडछाड सिद्ध करु शकलं नाही.

एबीपी माझा वेब टीम