नवी दिल्ली : उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. त्यामध्ये आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनीही उडी घेतली आहे.


 

आठवलेंनी थेट बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा मायावती यांच्यावरच हल्ला चढवला आहे. "मायावती या बाबासाहेब आंबेडकरांच्या नावावर राजकारण करतात, मात्र त्यांची तत्वं, आदर्श पाळत नाही", असं निशाणा आठवलेंनी साधला. 'इंडियन एक्प्रेस'ला दिलेल्या मुलाखतीत आठवलेंनी मायावतींवर हल्लाबोल केला.

 

मायावतींनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही?

रामदास आठवलेंनी मायावतींना अडचणीत टाकणारा प्रश्न विचारला आहे. मायावतींनी अद्याप बौद्ध धर्म का स्वीकारला नाही? असं विचारत, आठवलेंनी मायावतींना बॅकफूटवर ढकललं आहे. इतकंच नाही तर मायावती हिंदू आहेत, त्यांना दलितांशी घेणं-देणं नाही, असा आरोप आठवलेंनी केला.

 

दलितांनी बौद्ध धर्म स्वीकारायला हवा, असा सल्लाही आठवलेंनी दिला आहे.

 

'मोदी दलितविरोधी नाही'

मायवतींवर हल्ला चढवताना, आठवलेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपची मात्र पाठराखण केली आहे.

 

"पंतप्रधान मोदी अजिबात दलितविरोधी नाहीत. काही नेत्यांमुळे वादविवाद होत आहेत. मायावतींबाबत अपशब्द वापरणाऱ्या दयाशंकर यांना भाजपने हाकलून योग्य कारवाई केली आहे. मात्र मायावती त्याचं राजकारण करत आहेत", असं आठवले म्हणाले.

 

मग मानव रक्षा कोण करणार?

यावेळी गुजरातमधील उना प्रकरणाबाबतही आठवलेंना विचारण्यात आलं. त्यावर आठवले म्हणाले, "उनामध्ये दलितांना झालेली मारहाण निंदनीय आहे. त्याचं समर्थन कोणीच करत नाही. गोरक्षणासाठी कायदा करण्यात आला आहे. मात्र जर तुम्ही गो रक्षा करणार असाल, तर मानव रक्षा कोण करणार? असा सवाल आठवलेंनी यावेळी उपस्थित केला.

 

काही दिवसांपूर्वी गुजरातमधील उना भागात काही दलित तरुणांवर गायींचं कातडं काढून विकल्याचा आरोप होता. त्यामुळे या तरुणांना बेदम मारहाण करण्यात आली होती. त्याचे पडसाद संसदेत उमटले होते.