...म्हणून जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नि दिला नाही !
एबीपी माझा वेब टीम | 06 Dec 2016 09:31 PM (IST)
चेन्नई : तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांचं चेन्नईतील अपोलो रुग्णालयात दीर्घ आजाराने निधन झालं. त्या 68 वर्षांच्या होत्या. जयललितांच्या रुपाने दक्षिण भारताच्या राजकारणातील दिग्गज चेहरा काळाच्या पडद्याआड गेला आहे. सोमवारी रात्री ११.३० वाजता अपोलो रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. जयललिता यांच्या पार्थिवाला अग्नी दिला नाही, तर दफन करण्यात आले. यामागे खालील दोन कारणे असण्याची शक्यता आहे. कारण क्रमांक - 1 जयललिता या जातीने ब्राह्मण आहेत. त्यामुळे ब्राह्मणांमध्ये दहन करण्याची प्रथा आहे. पण जयललिता यांची जडणघडण आणि कारकीर्द पुरोगामी नेत्यांमध्ये झाली. त्यात एमजी रामचंद्रन यांचा समावेश होता. त्यामुळे निरीश्वरवादी द्रविडींप्रमाणेच जयललिता यांनाही दफन केले. कारण क्रमांक - 2 एखाद्याला दहन करण्यासाठी वारस असावा लागतो. त्यामुळे जयललिता यांना कुणीच वारस नसल्याने त्यांना दफन केले जात असल्याचीही शक्यता आहे. त्यांची एक भाची अमेरिकेत आहे. पण तिच्याशी जयललिता यांचे फारसे संबंध नव्हते. त्यामुळेही जयललितांना दफन केल्याची चर्चा आहे.