बेळगाव : कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारमय्या (Siddaramaiah) यांचा मुलगा, यतींद्र सिद्धारमय्या (Yathindra Siddaramaiah) यांनी एक वक्तव्य केलं आणि त्यावरून आता राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आपले वडील सिद्धारमय्या हे त्यांच्या राजकीय जीवनाच्या अंतिम टप्प्यात आहेत. कर्नाटकला आता प्रगतिशील विचारांच्या मुख्यमंत्र्यांची गरज आहे असं ते म्हणाले. त्याचसोबत सतीश जारकीहोळी (Satish Jarkiholi) हे मुख्यमंत्रिपदासाठी योग्य व्यक्ती आहेत अशीही राजकीय पुडी त्यांनी सोडली. त्यामुळे कर्नाटकात नोव्हेंबर महिन्यात मुख्यमंत्री बदलाची शक्यता असून सतीश जारकीहोळी यांचे नाव आघाडीवर असल्याची चर्चाही सुरू झाली.
एकीकडे काँग्रेसचे तारणहार अशी ओळख असलेले डी के शिवकुमार मुख्यमंत्रिपदासाठी फिल्डिंग लावून बसले असताना त्यांच्या गटाच्या पोटात गोळा यावा असं काही राजकारण सुरू झाल्याचं दिसतंय. सतीश जारकीहोळी हे सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री असून ते बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्रीही आहेत. पण एवढीच त्यांची ओळख नाही. बेळगावच्या राजकारणात सावकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जारकीहोळी कुटुंबाचं राजकारणही एखाद्या साऊथच्या चित्रपटाला लाजवेल इतकं भन्नाट आहे.
Satish Jarkiholi Next Karnataka CM : एकाच घरात चार आमदार, एक खासदार
बेळगावच्या राजकारणात दबदबा असलेल्या जारकीहोळी कुटुंबात चार सख्खे भाऊ वेगवेगळ्या पक्षातून आमदार आहेत. त्यापैकी एक विधान परिषदेवर तर तीन विधानसभेत आहेत. तर एक भाऊ कारखाना चालवतो. सतीश जारकीहोळी यांची 28 वर्षांची कन्या प्रियंका जारकीहोळी या चिक्कोडी मतदारसंघाच्या खासदार आहेत.
Jarkiholi Family : कोण कुठल्या पक्षातून आमदार?
- सतीश जारकीहोळी (काँग्रेस) - यमकनमर्डी
- रमेश जारकीहोळी (भाजप) - गोकाक
- भालचंद्र जारकीहोळी (भाजप) - अरभावी
- लखन जारकीहोळी (अपक्ष) - विधानपरिषद
- प्रियंका जारकीहोळी (काँग्रेस) - खासदार , चिक्कोडी
- भीमशी जारकीहोळी- कारखानदार
Belgaum Politics : सत्ता कुणाचीही असो, बेळगावात अंतिम शब्द जारकीहोळींचा
राज्यात सत्ता कुणाचीही असो, बेळगावच्या राजकारणात मात्र जारकीहोळी कुटुंबाचाच दबदबा असल्याचं दिसून येतंय. मूळचे गोकाकचे असलेल्या सतीश, रमेश, भालचंद्र आणि लखन या चौघांचा राजकीय प्रवास तितकात भन्नाट आहे. या भावांनी कधी एकमेकांच्या विरोधात निवडणुका लढवल्या, एकमेकांच्या विरोधात राजकीय कारस्थानंही केली. मात्र ज्यावेळी तिसऱ्या उमेदवाराचा विषय येतो, त्यावेळी मात्र या चारही भावांनी एकत्र येऊन त्याचा काटा काढल्याचं दिसतंय. मग त्यामध्ये कोण कुठल्या पक्षाचा याचा विचार केला जात नाही, फक्त कुटुंबाचाच विचार केला जातो. अटीतटीचं राजकारण आल्यानंतर त्यांनी एकमेकांना सोबत घेऊन राजकारण केल्याचं दिसतंय.
Ramesh Jarkiholi : एका भावाने काँग्रेसचे सरकार पाडलं
जारकीहोळी कुटुंबातील सर्वात मोठे भाऊ रमेश जारकीहोळी हे सध्या भाजपचे आमदार आहेत. 1999 पासून त्यांनी सातत्याने गोकाकमधून विजय मिळवला आहे. 2019 साली ते काँग्रेसचे आमदार होते. काँग्रेस-जनता दल सरकारमध्ये त्यांना उपमुख्यमंत्रिपद हवं होतं. ते न मिळाल्याने त्यांनी 16 आमदारांचा गट फोडला आणि भाजपसोबत गेले. जारकीहोळींमुळेच कर्नाटकात पुन्हा कमळ फुललं.
Who Is Satish Jarkiholi : सतीश जारकीहोळींचा प्रवास
सतीश जारकीहोळी हे 1999 पासून देवेगौडा यांच्या जनता दलमध्ये कार्यरत होते. जनता दलमध्ये असताना त्यांनी विधान परिषद सदस्य म्हणूनही काम केलं. त्यानंतर 2006 साली त्यांनी सिद्धारमय्या यांच्यासोबत जनता दल सोडले आणि काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 2008 साली बेळगावातील यमकनमर्डी या मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले.
Karnataka Politics : साधी राहणी पण राजकारणात दबदबा
सतीश जारकीहोळी यांची राहणी अत्यंत साधी आहे. एखाद्या त्रयस्त माणसाने त्यांना पाहिल्यास हा व्यक्ती मंत्री किंवा आमदार आहे यावर त्याचा विश्वासही बसणार नाही असा त्यांचा पोशाख. पण बेळगावच्या राजकारणात मात्र त्यांचा शब्द अंतिम असतो. मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांचे अत्यंत विश्वासू अशी सतीश जारकीहोळी यांची ओळख आहे.
Jarkiholi Politics : सगळे भाऊ बाहेरुन वेगळे, आतून एकत्रच
देशातील एखाद्या घराण्यात एकाच वेळी चार सख्खे भाऊ आमदार आणि एक मुलगी खासदार असं असण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल. सतीश जारकीहोळी आणि त्यांची खासदार कन्या काँग्रेसमध्ये आहेत. तर रमेश जारकीहोळी आणि भालचंद्र जारकीहोळी हे भाजपमध्ये आहेत.
वेळ पडली तर हे भाऊ एकमेकांच्या विरोधातही निवडणूक लढवतात, एकमेकांना पाडतातही. 2021 साली बेळगाव लोकसभेसाठी सतीश जारकीहोळी हे काँग्रेसच्या तिकीटावर उभे होते. त्यावेळी रमेश जारकीहोळी आणि लखन जारकीहोळी यांनी त्यांना विरोध केला आणि सतीश यांना फक्त पाच हजार मतांनी पराभव पत्करावा लागला.
असं असलं तरी हे चारही आमदार भाऊ आतून एकच असल्याचं अनेकदा दिसून येतंय. लखन जारकीहोळी यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत अपक्ष अर्ज भरला. त्यावेळी चारही भावांनी एका खोलीत काही मिनिटांचीच बैठक घेतली आणि भाजपच्या उमेदवाराला पाडून लखन यांना निवडून आणलं.
Karnataka Jarkiholi Politics : दहशत आणि दबाव, राजकारणाचा पाया
जारकीहोळींचा पाचवा भाऊ, भीमशी जारकीहोळी हे कारखानदार. गोकाक आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरातील एकून नऊ साखर कारखाने हे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या जारकीहोळींच्या मालकीचे असल्याचं सांगितलं जातं. भीमशी जारकीहोळी हा सगळा व्यवहार सांभाळतात. कारखान्यांच्या माध्यमातून जारकीहोळी बंधू पूर्ण जिल्ह्यावर दबदबा ठेवतात.
गोकाकमधील हिल गार्डन या सतीश जारकीहोळी निवासस्थानी लोकांचे अनेक प्रश्न सोडवले जातात. त्या ठिकाणी जारकीहोळींनी एखादा निर्णय दिलाच तर तो समोरच्याला मान्य करण्याशिवाय काहीच पर्याय नसतो. जर एखादा विरोधात गेलाच तर त्याला संपवण्यासाठी ते कोणत्याही थराला जातात अशी दबक्या आवाजात चर्चा असते.
एखादा कठीण प्रसंग आलाच तर सगळे जारकीहोळी बंधू एकत्र बसतात, त्यावेळी सतीश जारकीहोळींचा शब्द अंतिम असतो.
सत्ता कुणाचीही असो, बेळगावच्या राजकारणात मात्र जारकीहोळी बंधू सांगतील तोच अंतिम शब्द असतो. जर एखाद्या त्याच्या विरोधात गेला तर त्याचे राजकारण संपवण्याचं काम पाचही भाऊ करतात.
Karnatak AHINDA Politics : अहिंदा राजकारण केंद्रबिंदू
सतीश जारकीहोळी हे दलित समाजातून येतात. ते सामाजिक दृष्ट्या पुरोगामी विचारांचे नेते समजले जातात. कर्नाटकमधील आहिंदा (AHINDA) राजकारणाचे ते पाठीराखे आहेत. त्या माध्यमातून अल्पसंख्यांक, हिंदू समाजातील मागासवर्गीय आणि दलित यांच्यासाठी काम करतात. सामाजिक न्याय आणि आर्थिक समानतेवर आधारित सिद्धारमय्यांचे राजकारण ते पुढे नेत आहेत.
जिल्ह्याच्या राजकारणावर दबदबा असलेल्या सतीश जारकीहोळी यांचे काँग्रेसचे नेते डी के शिवकुमार यांच्याशी राजकीयदृष्ट्या पटत नाही. त्यामुळे जारकीहोळी बंधूंचे राजकारण संपवण्यासाठी अनेकदा प्रयत्न झाले. परंतु ते त्याला पुरुन उरले आहेत.
Karnataka News CM : मुख्यमंत्रिपद मिळणार की हूल ठरणार?
मुख्यमंत्री सिद्धारमय्या यांचे पुत्र यतींद्र यांनी जारकीहोळींच्या मुख्यमंत्रिपदावर भाष्य केलं असलं तरी त्याला अनेक राजकीय कांगोरे असल्याची चर्चा आहे. सिद्धारमय्या यांच्यानंतर मुख्यमंत्रिपदाकडे लक्ष लागून असलेल्या डी के शिवकुमार यांच्यासाठी तो एक संदेश असल्याचं बोललं जातं. कर्नाटकमध्ये सिद्धारमय्या यांच्या गटाकडेच सत्ता कशी राहिल याचे राजकारण सध्या सुरू आहे. आता खरोखरच सतीश जारकीहोळी यांना मुख्यमंत्रिपद मिळणार की ती नुसता हूलच ठरणार हे येणारा काळच सांगेल.
ही बातमी वाचा: