नवी दिल्ली : अटल बिहारी वाजपेयी यांनी जनतेला अखेरचं संबोधित कधी केलं होतं? हा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. याचं कारण वाजपेयी गेल्या एक-दोन नाही, तर आठ वर्षांपासून अंथरुणाला खिळून आहेत. तब्बल 13 वर्षांपूर्वी वाजपेयींनी अखेरची जाहीर सभा घेतली होती. विशेष म्हणजे ही सभा मुंबईत शिवाजी पार्कमध्ये झाली होती.

एप्रिल 2005 मध्ये भाजपच्या रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी भाषण दिलं होतं. हे भाषणही फार अल्पकाळात त्यांनी आटोपतं घेतलं. त्यावेळी लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन म्हणजे राम-लक्ष्मणाची जोडी असल्याचं अटलजी म्हणाले होते. यापुढे निवडणुका न लढवण्याची घोषणाही यावेळी वाजपेयींनी केली होती.

अटल बिहारी वाजपेयी 2005 मध्ये लखनौमधून लोकसभेचे खासदार होते. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते लोकसभेच्या कामकाजात नियमितपणे सहभागी होत नव्हते.

2007 मध्ये उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत मतदानासाठी वाजपेयी व्हिलचेअरवरुन गेले होते. त्याच वर्षी त्यांनी नागपुरात रेशीमबागेत संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली होती. 2009 मध्ये खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण झाल्यावर त्यांनी निवडणूक लढवली नाही.

मार्च 2015 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते अटलजींना त्यांच्या निवासस्थानी जाऊन 'भारतरत्न'ने सन्मानित करण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांचा एकही फोटो समोर आलेला नाही.