Maharashtra Tripura violence : त्रिपुरात एका समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात दोन दिवसांपासून आंदोलनं सुरु आहेत. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. अमरावती, नांदेडसह मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडत आहेत. यामध्ये अनेकजण जखमीही झाले आहेत. या घटनेनंतर राज्यातून संतप्त प्रतिक्रिया येत आहे. राज्यातील सरकारचं हे अपयश असल्याचं म्हणत विरोधकांनी हा मुद्दा लावून धरलाय. तर राज्यात दंगली घडवून सरकार अस्थिर करण्याचा भाजप प्रयत्न करत असल्याचा आरोप सत्ताधारी महाविकास आघाडीनं केलाय. पण, त्रिपुरात नेमकं काय घडलं होतं? ज्यामुळे दोन दिवसांपासून महाराष्ट्र धुमसतोय? बांगलादेशमध्ये घडलेल्या घटनेमुळे महाराष्ट्र का पेटलाय? जाणून घेऊयात घटनेबाबत सविस्तर 


सुरुवात नेमकी कुठून झाली?
त्रिपुरात  घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे अनेक मोर्चे निघाले.  ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागलं असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे.
पण या घटनेची सुरुवात बांगलादेशमधून झाली. ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्गापूजेदरम्यान बांगलादेशात हिंसाचार झाला. बांगलादेशातील चांदपूर, कमिला जिल्ह्यांमध्ये दुर्गापूजेदरम्यान तोडफोड करण्यात आली. कमिला  येथे दुर्गापूजा स्थळावर धार्मिक ग्रंथ आढळल्याचा आणि त्याचा अवमान झाल्याच्या कथित प्रकरणानंतर हिंसाचार उसळला आणि धार्मिक तेढ वाढला. त्यानंतर चांदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंज, काक्स बाजार या परिसरात घरांची, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. अनेक नागरिक जखमी झाले.


कमिलामध्ये नेमकं काय झालं?
बांगलादेशमधील हिंसाचाराच्या घटनेची सुरुवात कमिलामध्ये झाली. कमिलामध्ये नदी किनाऱ्यावर असणाऱ्या मंडपातून  झाली. मागील 20 वर्षांपासून दरवर्षी येथील हिंदू लोक मंडपात  दुर्गापूजा करतात. पूजाच्या आयोजकांमधील अचिंत्य दास या व्यक्तीनं बीबीसीला सांगितलं की, दुर्गा पुजा समाप्तीच्या दिवशी जवळपास अर्ध्या रात्रीपर्यंत लोकांची मंडपामध्ये ये-जा सुरु होती. लोकांची ये-जा बंद झाल्यानंतर आयोजकांनी मंडपाचा मुख्य पडदा बंद केला. स्टेजपासून जवळच मूर्ती होती. त्या मूर्तीजवळ दुसऱ्या धर्माचा ग्रंथ होता. पण हा धर्मग्रंथ तिथं आला कसा हे समजलं नाही. आयोजन स्थळी सुरक्षेसाठी सकाळपासून खासगी सुरक्षारक्षक उपस्थित होता. मात्र, धर्मग्रंथ आला कसा हे समजलं नाही.


भडका कसा उडाला?
दुर्गा पूजा मंडपात तोडफोड आणि धर्मग्रंथ ठेवल्याच्या घटनेनंतर काही छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय धार्मिक पोस्टही व्हायरल झाल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं. या व्हायरल मेसेजमुळे बांगलादेशमधील वातावरण तापलं होतं. त्यामुळे हिंसाचार भडकला.  त्यावेळी बांगलादेशमध्ये 22 जिल्ह्यात लष्कर तैनात करण्यात आलं होतं.


हिंसाचारास जबाबदार कोण?
बीबीसी हिंदीनं दिलेल्या माहितीनुसार, ड्रग्जच्या आहारी गेलेल्या आणि मानसिक संतुलन बिघडलेल्या 30 वर्षीय तरुणाने दुर्गा पूजा मंडपामध्ये धर्मग्रंथ नेला. जे हिंसाचाराचे कारण बनले. ही घटना CCTVमध्ये कैद झाली होती. या तरुणाने 13 ऑक्टोबर रोजी मंडपात धर्मग्रंथ ठेवला. त्यानंतर आठवडाभर बांगलादेशमध्ये दोन धर्मात तेढ निर्माण झाली अन् हिंसाचार भडकला. याला सोशल मीडियावरील पोस्टही कारणीभूत ठरल्या. 


बांगलादेशमधील हिंसाचाराचे त्रिपुरात पडसाद कसे?
बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ त्रिपुरातील पानीसागरमध्ये विविध ठिकाणी विश्व हिंदू परिषदेनं मोर्चे काढले. या मोर्चांना हिंसक वळण लागलं आणि घरांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावेळी काही धार्मिक स्थळांचीही तोडफोड झाली होती. त्यानंतर सोशल मिडीयावर या तोडफोडीचे व्हिडीओ काही समाजकंटकांकडून व्हायरल करण्यात आले. त्यानंतर त्रिपुरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात उफळला.


त्रिपुरात मोर्चा का काढला?
विश्व हिंदू परिषदेचे त्रिपुराचे प्रवक्ता पूर्ण चंद्र मंडल यांनी एबीपीशी बोलताना सांगितलं की, बांगलादेशमध्ये दुर्गा पूजेवेळी झालेल्या घटनेच्या निषेधार्त आपला विरोध दर्शवण्यासाठी त्रिपुरामध्ये रॅली काढली होती. बांगलादेशमध्ये दुर्गापूजेनंतर अन्याय करण्यात आला. देऊळ, मठ आणि मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याचा विरोध दर्शवण्यासाठी त्रिपुरात रॅली काढण्यात आली. 


महाराष्ट्रात लोण कसं पसरलं?
त्रिपुरात एका समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात महाराष्ट्रात शुक्रवारी आंदोलन पुकारलं गेलं. भिवंडी, नांदेड, मालेगाव, अमरावती, वाशिम या ठिकाणी आंदोलन पुकारण्यात आलं. आंदोलनावेळी दोन समाजात तेढ निर्माण होईल, अशाप्रकराचे मेसेज सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर दोन समाजात तेढ निर्माण झाले अन् आंदोलनाला हिंसक वळण लागलं. अनेक ठिकाणी जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेकीसारख्या घटना घडल्या. 
अमरावती येथील आंदोलन रजा अकादमीनं केल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं. तर रजा अकादमीमध्ये इतकी ताकद नाही, फक्त चार टाळकी आहेत. हा विरोधकांचा डाव असल्याचं शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले.  


सोशल मीडियावर दंगलीची वात पेटली –
सोशल मीडियावरील मेसेज, फोटो अन् व्हिडीओमुळे बांगलादेश, त्रिपुरा आणि महाराष्ट्रात दंगलीची वात पेटली. तिन्ही ठिकाणी काही समाजकंठकांनी आक्षेपार्ह मेसेज व्हायरल केल्यानंतर आंदोलनाला हिंसक वळण लागलं. या हिंसेप्रकरणी त्रिपुरात 102 सोशल मिडीया यूजर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. बांगलादेशमध्येही कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या हिंसाचारप्रकरणी दोषी असणार्यांवर कारवाई करणार असल्याचं सांगितलं आहे. सोशल मीडियाचा वापर जितका चांगलाय, त्यापेक्षा वाईट आहे. त्यामुळे सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या मेसजवर विचारपूर्वकच विश्वास ठेवा.