West Bengal Election: पश्चिम बंगालमधील 294 जागांसाठी पार पडलेल्या महासंग्रामाचा उद्या (4 मे) रोजी निकाल जाहीर होणार आहे. या निवडणुकीत केवळ सत्ताच नव्हे, तर राज्याची राजकीय दिशाही ठरणार असल्याने ही लढत अत्यंत अटीतटीची मानली जात आहे. उद्या सकाळी 8 वाजता टपाली मतदानापासून (Postal Ballots) मोजणीला सुरुवात होईल. निकालानंतर होणारा संभाव्य हिंसाचार रोखण्यासाठी निवडणूक आयोगाने पुढील 15 दिवस केंद्रीय सुरक्षा दलांच्या कंपन्या बंगालमध्येच तैनात ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पीएम मोदी अमित शाहांसह तब्बल जवळपास 19 राज्यातील नेते ममतांविरोधात प्रचारात होते. केंद्रीय फौजा सुद्धा मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आल्या होत्या. त्यामुळे बंगालमध्ये यावेळी अटीतटीची लढत झाली आहे. तृणमूलची जबाबदारी एकहाती ममता बॅनर्जी यांच्याकडेच होती.
बंगालमध्ये दोन टप्प्यात मतदान
बंगालमध्ये यंदा एकूण दोन टप्प्यात (23 आणि 29 एप्रिल) मतदान पार पडले. मतदानाची एकूण टक्केवारी तब्बल 92 टक्केच्या आसपास राहिली आहे. त्यामुळे मागील निवडणुकीच्या तुलनेत वाढलेला आकडा कोणाला धक्का देणार याची सुद्धा उत्सुकता आहे. बंगाल विधानसभेच्या एकूण 294 जागा असून बहुमतासाठी 148 हा जादूई आकडा गाठणे आवश्यक आहे.
2021 मध्ये काय घडलं होतं?
गेल्या निवडणुकीत ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसने (TMC) 215 जागांसह दणदणीत विजय मिळवला होता. भाजपने 77 जागा जिंकून प्रमुख विरोधी पक्ष म्हणून स्थान मिळवले होते.
एक्झिट पोल आणि हाय व्होल्टेज लढती
दरम्यान, निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, हिंसाचार आणि तांत्रिक बिघाडामुळे मालदा आणि मुर्शिदाबादमधील काही केंद्रांवर (अंदाजे 8-10 केंद्रांवर) 3 मे रोजी पुन्हा मतदान घेण्याचे आदेश दिले होते.
हाय व्होल्टेज लढती
यंदा भवानीपूरमधून ममता बॅनर्जी, नंदीग्राम आणि फाल्टा (अभिषेक बॅनर्जी यांचा मतदारसंघ) या जागांवर संपूर्ण देशाचे लक्ष आहे. तसेच सुवेंदु अधिकारी यांच्या प्रभावाखालील मेदिनीपूर पट्ट्यातील जागाही महत्त्वाच्या आहेत.
भाजपकडून जोरदार प्रचार
भाजपने कथित भ्रष्टाचार, ओबीसी आरक्षणातील तफावत, संदेशखाली प्रकरणावरून महिला सुरक्षा, घराणेशाही या मुद्द्यांवरून तृणमूलला लक्ष्य केले.दुसरीकडे ममतांनी 'बंगालची मुलगी' हे भावनिक आवाहन करत केंद्राकडून मिळणाऱ्या निधीत होणारा भेदभाव आणि बाह्य शक्तींचे आक्रमण यावर भर दिला. लक्ष्मी भंडार आणि आरोग्य साथी यांसारख्या लोककल्याणकारी योजनांचा त्यांनी प्रभावी वापर केला.
निवडणूक आयोगावर गंभीर आरोप
बंगालच्या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरून अत्यंत गंभीर आरोप झाले आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगावर 'पक्षपातीपणा'चा आरोप केला. विशेषतः, केंद्रीय सुरक्षा दलांचा (CAPF) वापर करून मतदारांना घाबरवल्याचा आणि मतदानाचे वेळापत्रक भाजपला पूरक केल्याचा आरोप खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी केला होता.
मतदानाला हिंसाचाराचे गालबोट
यंदाही बंगालमधील निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट लागले. कूचबिहार आणि उत्तर परगणा या भागात मतदानाच्या दिवशी कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यामुळे काही ठिकाणी गोळीबार आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. मतदानापूर्वी संदेशखाली येथील महिला अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला होता, ज्याचे पडसाद निवडणुकीच्या शेवटच्या दिवसापर्यंत उमटत राहिले.
इतर महत्वाच्या बातम्या
