नवी दिल्ली : देशांतर्गत विमान वाहतूक 25 मे पासून नियंत्रित पद्धतीनं सुरु होत आहे. त्यानंतर आता आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक कधी सुरु होणार याचीही उत्सुकता आहे. आज केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी त्याबाबत महत्वाचं विधान केलं आहे. आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक ऑगस्ट महिन्याच्या आधी सुरु करण्याचा प्रयत्न करू असं हरदीप पुरी यांनी म्हटलं आहे. विमान वाहतुकीशी संबंधित प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी आयोजित केलेल्या फेसबुक लाईव्हमध्ये एका प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.


25 मार्चपासून देशातली विमान वाहतूक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बंद करण्याची घोषणा करण्यात आली होती. सुरुवातीला सरकार देशांतर्गत वाहतूक 33 टक्के क्षमतेनं पूर्वपदावर आणणार आहे. त्यासाठी विशेष नियमावलीही सरकारनं जाहीर केलेली आहे. देशाबाहेर अडकलेल्या नागरिकांसाठी सरकारचं वंदे भारत मिशन सध्या सुरू आहे. पण आंतरराष्ट्रीय विमान वाहतूकीस मात्र सरकारनं अद्याप हिरवा कंदील दिलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बोलताना केंद्रीय वाहतूक मंत्री हरदीप पुरी म्हणालेत, "ऑगस्ट किंवा सप्टेंबरच्या आधी आम्ही आंतरराष्ट्रीय सेवा सुरु करू शकू असा विश्वास मला वाटतोय, जरी पूर्ण क्षमतेनं ही वाहतूक तोपर्यंत सुरु होऊ शकली नाही, तरी किमान काही ठराविक टक्के क्षमतेनं तरी ती सुरु करू". जगातल्या अनेक राष्ट्रांनी कोरोनाच्या पार्श्वभूीवर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानसेवा काही काळ बंद ठेवली आहे.


यापूर्वी  देशातील विविध भागात अडकलेल्या नागरिकांसाठी देशांतर्गत विमान वाहतूक येत्या 25 मेपासून सुरु होणार असून त्यासाठी सर्व विमानतळे सज्ज ठेवण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत. कोरोनाच्या या संकटाच्या काळात विमान कंपन्यांकडून प्रवाशांची लूट होऊ नये यासाठी तीन महिन्यांसाठी हे कमाल किमान दर निश्चित करण्यात आले आहेत.